राज्यभर जन्माष्टमीचा उत्साह पण मुंबई, ठाण्यातील अनेक मानाच्या दहीहंडया रद्द
मुंबई: देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी केली जात आहे. महाराष्ट्रातही मुंबई, पुणे, औरंगाबाद या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने जन्माष्टमी व दहीहंडी चा उत्सव साजरा करण्यात येत आहे.
सर्वात मोठे आकर्षण असते ते मुंबईतील दहीहंडी उत्सवाचे पण यंदा कोकण, सांगली, कोल्हापूरच्या पूर संकटाच्या पार्श्वभूमीवर जवळपास सर्व मंडळांनी उत्सवाचा आवाका आटोक्यात ठेवला आहे. अनेक मोठ्या मंडळांच्या दहीहंड्या रद्दही करण्यात आल्या आहेत. ज्यात, आमदार प्रकाश सुर्वे यांची मानाची हंडी, शिवसेनेचे सचिन अहिर यांच्या वरळीतील संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी, भाजप चे घाटकोपर मधील आमदार राम कदम यांची दहिहंडी रद्द करण्यात आली आहे.
ठाण्यात या वर्षीही जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्ष प्रतिष्ठानची हंडी रद्द करण्यात आली आहे. वर्तकनगर येथे आमदार प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानची दहीहंडी होणार आहे पण या वर्षी खर्चाला फाटा देत अत्यंत साधेपणाने हंडी साजरी केली जाणार असल्याचे व तेच पैसे पुरग्रस्तांसाठी खर्च केले जाणार असल्याचे पूर्वेश सरनाईकांतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. मनसेचे ठाणे व पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनीही दहीहंडीचे आयोजन केले आहे पण सोबतच पुरग्रस्तांसाठी साडेपाच लाख रुपये व १२ घरे बांधून दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यंदा दर वर्षीसारखा दहीहंडीचा उत्साह आयोजकांकडून दिसत नसल्यामुळे गोविंदांची थोडी निराशाच झाल्याचे जाणवते.