काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार सिंचनाच्या नावाखाली प्रचंड घोटाळे करुन आपले खिसे भरत होते – आदित्य ठाकरे
माहूर: देशद्रोहाचे कलम काढून टाकत अतिरेकी प्रवृत्तींना समर्थन करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीला या निवडणुकीत धडा शिकवा आणि त्यांचे हे पाप श्रीक्षेत्र माहूरगडच्या पापनाशक तलावात बुडवा, असे आवाहन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे केले. शिवसेनेचे हिंगोली मतदारसंघातील उमेदवार आमदार हेमंत पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
महाराष्ट्रातील साडेतीन पिठापैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र माहूरगड येथे रेणूका देवीचे दर्शन करत नंतर त्यांनी हिंगोली मतदारसंघातील प्रचार सभेला सुरुवात केली. या सभेत आदित्य ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र यांच्यात आपापसात भांडणे लावून काँग्रेस राष्ट्रवादीने आपआपल्या पोळ्या भाजून घेतल्या. सिंचनाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करुन शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम त्यांनी केले. गेली अनेक वर्षे सत्ता त्यांच्या हातात होती, मात्र बेरोजगारी, शेतकरी, शेतमजूर आदींसाठी कुठलेही ठोस काम केले नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी सरकारने केवळ आपल्या तिजोऱ्या भरल्या. दुष्काळाची पाहणी करताना शेतकऱ्यांचे दुःख आम्ही जाणून घेतले. प्रसंगी त्यांना पशुखाद्य दिले. त्याकाळात काँग्रेसचा एकही नेता व कार्यकर्ता शेतकऱ्यांचे दुःख जाणून घेण्यासाठी फिरला का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थितांना केला.
सिंचनाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात निधी येवूनही काँग्रेसच्या काळात ती कामे पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. काँग्रेस – राष्ट्रवादीचे सरकार सिंचनाच्या नावाखाली प्रचंड घोटाळे करुन आपले खिसे भरत होते, या सर्व पापी मंडळींना श्रीक्षेत्र माहूरच्या पापनाशक तलावात बुडवून टाका, असे देखील आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
काँग्रेस – राष्ट्रवादीचे सरकार उलथवून टाकण्यासाठी हिंगोलीचा खासदार देखील शिवसेना-भाजपा युतीचाच असला पाहिजे. हिंगोलीत पुन्हा भगव्याचे तेज निर्माण करा आणि शिवसेना, भाजपा महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांना विजयी करा, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले.