हेटवणे धरणातून पाणी पुरवठा करण्याची पूर्व विभागातील ग्रामपंचायत व आठगाव पाणी कमिटीची मागणी
उरण, दि.१७(विठ्ठल ममताबादे): उरण पूर्व विभागात नेहमी भेडसावणारा प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न. शुद्ध पाणीपुरवठा व्हावा यासाठी वशेणी, सारडे, पिरकोन, आवरे, गोवठणे, पाले या गावातील लोक नेहमी आग्रही असतात. पण या प्रश्नाबाबत प्रशासनामध्ये नेहमी उदासीनता दिसून येते. आणि यासाठीच आठगाव पाणी कमिटी व उरण पूर्व विभागातील वशेणी, सारडे, पिरकोन, आवरे, गोवठणे गावातील सरपंचांनी हेटवणे धरणातील पाणी पुरवठा व्हावा आणि येथील लोकांना नवीन हेटवणे नळ कनेक्शन उपलब्ध व्हावे यासाठी सिडको अध्यक्षांकडे पाठपुरावा करण्यासाठी उरण विधानसभेचे आमदार महेश बालदी यांना निवेदन देण्यात आले. मार्च, एप्रिल व मे महिन्यात पुनाडे धरणाची पाण्याची पातळी फारच कमी होते. पुनाडे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजने अंतर्गत पाण्यावर अवलंबून असलेली लोकसंख्या जवळ-जवळ पंचवीस हजार आहे. हेटवणे योजनेचे पाण्याचे नळ कनेक्शन मिळाल्यास मार्च-एप्रिल-मे या कालावधीत उरण तालुक्यातील पूर्व विभागात पाणी टंचाई निर्माण होणार नाही. त्यासाठी हेटवणे धरणातून पाणी पुरवठा व्हावा यासाठी ग्रामपंचायतीद्वारे आठ गाव पाणी कमिटीने हा प्रश्न सोडविण्यासाठी आमदार महेश बालदी यांना साकडे घातले आहे. यावेळी आमदारांना निवेदन देताना भारतीय जनता पार्टीच्या उरण महिला तालुका अध्यक्षा राणी म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते गुरूनाथ गावंड ग्रामपंचायत सदस्य आवरे, उरण तालुका भाजपा उपाध्यक्ष आणि सामाजिक प्रश्नांची जाण असणारे मुकुंद गावंड, सरचिटणीस भाजपा उरण तालुका निर्मला घरत, माजी सरपंच वशेणी विजय म्हात्रे, पिरकोन गावातील जेष्ठ कार्यकर्ते प्रभाकर गावंड, आवरे गावातील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र म्हात्रे, केशव म्हात्रे, प्रविण भगत उपस्थित होते.