उद्या दाऊद इब्राहिमही भारतात येईल, बिनधास्त फिरेल कारण त्याच्यावर देशद्रोहाचा खटलाच चालणार नाही : उद्धव ठाकरे
नाशिक: “५० वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी जे बीज पेरलं ते आज हिंदुत्व म्हणून उभे आहे. तो भगवा ध्वज आज विरोधकांना पाहवत नाही. जो आपल्या भारतमातेशी द्रोह करेल त्याला आम्ही फासावर लटकवणार.” अशी गर्जना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी नाशिक येथे केली. महायुतीचे नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार खासदार हेमंत गोडसे व दिंडोरी मतदारसंघातील भाजप उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या प्रचारासाठी बुधवारी सायंकाळी नाशिक येथील सभेत उद्धव ठाकरे हे बोलत होते.
ज्यावेळी आघाडीच्या हाती सत्ता होती, त्या काळात दररोज घोटाळे बाहेर पडत होते. आदर्श घोटाळा, सैनिकांच्या बुलेटप्रूफ जॅकेटचा घोटाळा, जनावरांच्या चारा छावणीतील शेणाचा घोटाळा असे एक नव्हे तर शेकडो घोटाळे करणाऱ्यांच्या हातात पुन्हा देशाची सत्ता देणार काय, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी, केंद्रात हिंदुत्ववादी सरकार नको म्हणून बिनबुडाचे व बिनचेहऱ्याचे अनेक लोक निव्वळ सत्तेसाठी एकत्र आल्याचा आरोप केला.
आमचा दोष नसताना अटक झाली असा दावा करतायत, पण तुम्ही शिवसेनाप्रमुखांना अटक करायला का निघाला होता याचे उत्तर द्या, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
शरद पवार यांनी राजीव गांधी यांना देखील दगा दिला होता. त्यावेळी विचारणा केली असता शरद पवार म्हणाले होते, मी एक वेळ तोंडाला काळे फासून हिमालयात निघून जाईन पण पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार नाही. कुठे गेला हिमालय? कुठे गेले ते काळे तोंड.?, असा सवाल त्यांनी शरद पवार यांना विचारला.
इशरत जहाँच्या घरी राष्ट्रवादीचे शरद पवार गेले. परंतु, आत्महत्याग्रस्त शेतकर्याच्या घरी कधी गेले का? आमची युती देव, देश आणि धर्मासाठी आहे. तुमची आघाडी कशासाठी आहे. कन्हैया कुमारसारखा देशद्रोही निवडणूक लढवतो ते यांना चालते. औरंगजेबच्या थडग्यावर डोके टेकविणार्या औवेसीच्या नादी लागू नका, असे आवाहन त्यांनी दलित, मुस्लिम बांधवांना केले. आघाडीत आज कोण नेता आहे. मायावती, अखिलेश यादव यांना काँग्रेस नकोय. मग पंतप्रधान म्हणून पुन्हा देवेगौडा बसविणार का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
जवाहरलाल नेहरु आणि महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यलढ्यात यातना भोगल्या. पण स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इंग्रजांसमोर नमते घेतल्याचे राहुल गांधी यांनी या भाषणात म्हटले होते. यावरुन उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी आणि शरद पवार यांचा समाचार घेतला. स्वातंत्र्यलढ्यात यातना भोगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आम्ही आदर करतो. पण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारखे वीर जन्माला आले नसते तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे सत्तेचे स्वप्न पाहू शकले नसते. पंडित जवहारलाल नेहरु यांनी सावरकांइतक्या हालअपेष्टा तुरुंगात भोगल्या असतील तर नेहरुंनाही वीर जवाहरलाल नेहरु असे म्हणायला मी तयार असल्याचेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी देशद्रोहाचा कलम रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे. मग देशावर राज्य कोण करणार, उद्या दाऊद इब्राहिमही भारतात येईल, बिनधास्त फिरेल कारण त्याच्यावर देशद्रोहाचा खटलाच चालणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
बालाकोटमध्ये झालेल्या हल्ल्याविषयी जवानांचे कौतुक करायचे सोडून हल्ला खरच झाला का, अतिरेकी इतकेच मारले गेले का अशी विचारणा करून विरोधक जवानांचे खच्चीकरण करत होते. देशावर हल्ला करणारे अतिरेकी, दहशतवादी तुमचे नातेवाईक आहेत का असा सवाल ठाकरे यांनी विरोधकांना विचारला. आज देशाभोवती हिरवा फास आवळला जातोय. पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी बांगलादेशातून फिरदोस अहमद या अभिनेत्याला आणले जाते. का तर तेथील बांगलादेशी मते मिळविण्यासाठी. तिकडे फारूक अब्दुला, मुप्ती मेहबुबा देशाविरोधी फुत्कार ओकत आहे. अशा गोष्टींना हद्दपार करण्यासाठी भगव्याला साथ देण्याचे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले.