“‘व्यंगनगरी’ मूक झाली” प्रसिद्ध व्यंगचित्रकार विकास सबनीस यांच्या निधनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
मुंबई : प्रसिद्ध व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचं काल मुंबईत हृदयविकरानं निधन झालं. ते एकोणसत्तर वर्षांचे होते. गेले काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते. बाळासाहेब ठाकरे आणि आर. के. लक्ष्मण यांच्यापासून स्फूर्ती घेऊन सबनीस यांनी १९६८ मधे व्यंगचित्र काढायला सुरुवात केली.
५० वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांची व्यंगचित्र विविध इंग्रजी आणि मराठी नियत कालिकांमधे प्रसिद्ध होत होती. स्थानिक ते जागतिक पातळीवरच्या विविध विषयांना स्पर्श करणारी त्यांची व्यंगचित्र वाचकांच्या पसंतीस उतरत होती.
ज्येष्ठ राजकीय व्यंगचित्रकार विकास सबनीस यांच्या निधनाने कलाक्षेत्राचा मार्गदर्शक हरपला असून संपूर्ण ‘व्यंगनगरी’ मूक झाली आहे. या क्षणाला ठाकरे कुटुंबातील एक सदस्य कायमचा दूर गेल्याचे दु:ख मनात आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, विकास सबनीस यांनी कुंचल्याच्या फटकाऱ्यांनी राजकीय परिस्थितीवर अचूक भाष्य करीत त्यांनी अनेकांना घायाळ केले. ‘मार्मिक’शी त्यांचे विशेष ऋणानुबंध होते. व्यंगचित्रामागे असलेला विचार ही त्यांची विशेष ओळख होती. रेषांच्या सहाय्याने राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना त्याच्या परिणामांचा विचारही त्या व्यंगचित्रामागे असे. स्व बाळासाहेब ठाकरे, आर.के. लक्ष्मण अशा महान व्यंगचित्रकारांकडून प्रेरणा घेऊन या दोघांचा वारसा त्यांनी समर्थपणे पुढे नेला. त्यांच्या निधनाने ५० वर्षे कलेची सेवा करणारा निष्ठावंत कला उपासक हरपला आहे.
—-
व्यंगचित्रकार विकास सबनीस यांच्या शिवाजी पार्क येथील निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले व त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले.
(Credit – AIR)