नागरिकत्व सुधारणा कायद्यात कोणाचंही नागरिकत्व हिरावून घेणारी तरतूद नाही असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं स्पष्टीकरण, विरोधकांनी जनतेची दिशाभूल करु नये असं केलं आवाहन
शिमला: नागरिकत्व सुधारणा कायद्यात कोणाचंही नागरिकत्व हिरावून घेणारी तरतूद नाही असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिमल्यात झालेल्या जाहीर सभेत सांगितलं. विरोधकांनी अशी एक तरी तरतूद दाखवून द्यावी असं आव्हान त्यांनी दिलं.
शेजारच्या देशांमधे धार्मिक छळ झाल्यामुळं निर्वासित झालेल्या अल्पसंख्याकांना हा कायदा भारताचं नागरिकत्व देतो. काँग्रेस आणि इतर पक्ष या कायद्याबद्दल अपप्रचार करत असून अफवांना खतपाणी घालत आहेत असा आरोप शहा यांनी केला.
संविधानाचं कलम 370 रद्द करणं, अयोध्येत राममंदिर उभारणीच्या कामाला प्रारंभ तसंच लष्करासाठी ‘एक पद एक निवृत्तीवेतन योजना’ या केंद्रसरकारच्या कामगिरीचा उल्लेख त्यांनी केला.
निवृत्त सेना अधिकारी आणि कर्मचा-यांच्या खात्यात सरकारने 25 हजार कोटी रुपये जमा केले आहेत असं ते म्हणाले. साडे तेरा हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचा प्रारंभ केल्याबद्दल त्यांनी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचं अभिनंदन केलं.
(Credit – AIR)