अवैध सावकारीविरोधात आ. विद्या चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करणार – वित्तमंत्री जयंत पाटील
राज्यात सावकारांकडून होणारी कर्जदारांची पिळवणूक रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सावकारी अधिनियम अध्यादेश २०१४ हा सुधारित कायदा संपूर्ण राज्यभर लागू केला होता. मात्र, आजही राज्यातील अनेक शेतकरी अवैध सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या करत आहेत. शिवाय काही सरकारी अधिकारी अवैध सावकारांना मदत करतात. पोलीस देखील बघ्याची भूमिका बजावतात. या सावकारी जाचामुळे महिलांवर अनेक अत्याचार केले जातात. मात्र कारवाई केली जात नाही. त्यामुळे अशा असंवेदनशील पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज असून अवैध सावकारीच्या धंद्याचा कायमचा बीमोड करण्यासाठी राज्य शासनाने एक समिती तयार करावी, अशी मागणी आ. विद्या चव्हाण यांनी अल्पकालीन चर्चेत केली.
या अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना कॅबिनेट मंत्री जयंत पाटील म्हणाले की, “अवैध सावकारीचा कायमचा बीमोड करण्यासाठी सावकारी अधिनियम अध्यादेश २०१४ हा सुधारित कायदा संपूर्ण राज्यभर लागू करण्यात आला आहे. मात्र, अजूनही राज्यात काही ठिकाणी अवैध सावकारी सुरू आहे. यासंदर्भात आ. विद्या चव्हाण यांनी पश्चिम महाराष्ट्रात जाऊन अनेक प्रकरणे उघडकीस आणली. पण यावर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे आ. विद्याताईंच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करून सावकारी कायद्याच्या बाबतीत काही सुधारणा सुचविल्या जातील त्या अमलात आणण्याचा प्रयत्न राहील. तसेच अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.”