गव्हाण फाटा ते दिघोडे गावं महामार्गावर यार्डवाल्यांची अनधिकृत पार्किंग बनतेय प्रवाशांकरिता जीवघेणी
उरण, दि.१(विठ्ठल ममताबादे): दिघोडे गाव, वेश्वी, जांभुळपाडा ते गव्हाण फाटा दरम्यान महामार्गाच्या दुतर्फा बांधण्यात आलेल्या असंख्य गोडाऊन्स, एमटीयार्ड, सी.एफ.एस, वेअरहाऊस कंपन्यांमुळे सबंध विभागात होणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक एवढी भयंकर प्रमाणात वाढली आहे की या वाहतूक कोंडीमुळे अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे आजूबाजूच्या गावांतील प्रवाशांना कामानिमित्त बाहेर पडताना जीव मुठीत घेऊन बाहेर पडावं लागत आहे. त्यातच ह्या रस्त्याच्या दुतर्फा असणारे कंटेनर यार्ड आणि सी.एफ.एस यांचे माल घेऊन येणारे कंटेनर लोडेड ट्रेलर हे त्याच मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुतर्फा दोन दोन लाईनमध्ये अनधिकृत पणे उभे असतात (जसे काही हा रोड ह्यांची वाहनं पार्किंग करण्याकरीताच बांधण्यात आला अशा अविर्भावात हे यार्ड मालक मुजोरी करीत असतात) आणि ह्या यार्डवाल्यांच्या मुजोरपणामुळे आणि अनधिकृत पार्किंग मुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या भूमिपुत्र तरूणांना, सामान्य जनतेला जीवघेण्या अपघातात नाहक आपला जीव गमवावा लागत आहे.
या मार्गावर आजपर्यंत अनेक अपघात झाले आहेत आणि दोन दिवसा पूर्वी दिघोडे वेश्वी मार्गावर एक विचित्र अपघात झाला. त्या अपघातात एका प्रवाशी रिक्षाला एका भरधाव ट्रेलरने धडक दिल्यामुळे त्या रिक्षातील प्रवासी आणि रस्त्यावरून दुचाकी वरून प्रवास करणारे दोन तरुणांचे जीव जाता-जाता वाचले. त्या तरुणांनी प्रसंगावधान व समयसुचकता दाखवत आपल्या दुचाकी वरून खाली उड्या मारल्यामुळे आज मृत्यूच्या दाढेतून थोडक्यात बचावले. सोबतच त्याच वाहतूक कोंडीत एका गरोदर महिलेला दवाखान्यात घेऊन जात असलेली रुग्णवाहिका अडकून पडल्यामुळे अक्षरशः त्या माऊलीला रस्त्यातच प्रसुती होण्याची भयानक परिस्थिती ओढवली. एवढ्या भयानक परिस्थितीला ह्या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रोजच वाहतूक कोंडीला सामोरं जावे लागतं आहे. ह्याच घटनेच्या विरोधात झोपलेल्या प्रशासनाला झोपेतून जागे करण्याकरिता अपघात झाल्या त्या ठिकाणी आजूबाजूच्या गावातील संतप्त ग्रामस्थांनी आणि महिला भगिनींनी आवाज उठवत वाहतूक विभागाला आणि कंपनी व्यवस्थापनाला धारेवर धरत जनआक्रोश प्रदर्शित करत रस्तारोको करत आपला संताप व्यक्त केला.
दिघोडे ते गव्हाण फाटा ह्या रस्त्यावर प्रवास करतांना येथील आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना आणि कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या युवक युवतींना अवजड वाहनांमुळे रस्त्यावरून प्रवास करतांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. रोजच घडणाऱ्या अपघातांच्या घटना पाहता प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य त्या उपाययोजना केल्या नाहीत तर याच्या विरोधात केअर ऑफ़ नेचर सामाजिक संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर यांच्या वतीने व अनेक संघटनांच्या वतीनं सोबतच आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा केअर ऑफ़ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर यांच्या वतीने देण्यात आला आहे.