आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक विरोधक एकत्र येत असल्यामुळे भाजपने शिवसेनेसोबत युती करण्याच्या हालचालींना वेग दिला आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. यावेळी अमित शहा आणि उद्धव ठाकरे या दोघांमध्ये जागावाटपाबाबत चर्चा झाली. या चर्चेदरम्यान उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्यासमोर १९९५ च्या जागावाटप सूत्राचा प्रस्ताव समोर ठेवल्याचे सांगितले जाते.
१९९५ च्या निवडणुकीत शिवसेनेने विधानसभेच्या १७१आणि भाजपने ११७ जागा लढवल्या होत्या. त्या निवडणुकीत १३८ जागा जिंकून राज्यात शिवसेना-भाजप युतीचं पहिलं सरकार स्थापन झालं होतं. १९९५ च्या जागावाटपाच्या सूत्रानुसार राज्यात जर युतीचं सरकार आलं तर मुख्यमंत्रीपदावर शिवसेनेचाच दावा असेल. युतीसाठी लोकसभेचे जागावाटप कसे असेल, हे अद्याप निश्चित झालेले नाही.
आता सध्या राज्याच्या विधानसभेत भाजपचे १२२ आमदार असताना सुद्धा असताना १९९५ च्या जागावाटप सूत्रानुसार भाजप ११७ जागा लढवणार का, असा प्रश्न सध्या मोठया प्रमाणावर उपस्थित होत आहे. त्याच बरोबरीने राज्यात नेहमीच मोठा भाऊ शिवसेनेच असेल, अशी शिवसेनेची भूमिका कायम असल्याने लोकसभा निवडणुकीत जागावाटपाचा तिढा नेमका कसा सुटेल असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.