“गोंधळ घाला आणि गोंधळ मधून सटकून निघून जा असे यांचे धोरण आहे की काय ?”: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
नागपूर: विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज पासून सुरुवात झाली. या अधिवेशनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा जाहीर मेळावा घेतला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की, “सत्ता आल्यानंतर ना मी बदललो आहे ना तुम्ही बदलला आहात. जे शिवधनुष्य मी पेलले आहे त्याला तुमच्यासारखे साथीदार हवे आहेत. पद मोठ आहे, आव्हान ही मोठे आहे.”
यानंतर झालेल्या बैठकांचा संक्षिप्त इतिवृतांत त्यांनी सांगितला. ते म्हणाले की, “विदर्भातील दोन जिल्ह्यांचा आढावा मी घेतला आहे. कामे अजूनही तशीच बाकी आहेत. प्रश्न काही सुटलेले नाहीत. राहिलेले प्रश्न सोडवण्यासाठी आता सरकार म्हणून आपण काम करणार आहोत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे याला माझे प्राधान्य राहील.”
मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे:
१) शिवसेनेचा कुटुंब प्रमुख आज मुख्यमंत्री आहे. काल ही आपण हिंदू होतो आजही आपण हिंदूच आहोत हिंदुत्वाचा मुद्दा आपण सोडलेला नाही. युती तुटली म्हणजे धर्मांतर केलं नाही.
२) गोरगरिबांना आपलं सरकार आलंय असं वाटलं पाहिजे. हे सरकार म्हणजे जनतेच सरकार आहे.
३) कितीही मोठे झालो तरी नम्र राहायचं ही बाळासाहेब यांची शिकवण आहे. आधीच्या सरकार सारख वागायचे नाही.
४) शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार. आम्ही आमची वचनं पूर्ण करणार. आमची वचनं आम्हाला आठवण करून देण्यासाठी आमचा काही स्मृतिभ्रंश झालेला नाही.
५) गोरगरिबांच्या पाठी ‘भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे’ असं बोलणार कोणतरी पाहिजे. आम्ही आहोत.
६) निर्वासित काश्मिरी पंडितांना हक्काचे घर देण्यासाठी बोलणारे फक्त एकमेव हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. शिवसेना काय आहे आमची ओळख करून देण्यासाठी तुमची गरज नाही.
७) गोंधळ घाला आणि गोंधळ मधून सटकून निघून जा असे यांचे धोरण आहे की काय ?
८) सत्ता आल्यानंतर उतू नका मातू नका हातामध्ये घेतलेला वसा सोडू नका.