मराठवाड्याचा दुष्काळ संपेपर्यंत शिवसेना तुमच्या खांद्याला खांदा लावून दुष्काळाशी लढणार : उद्धव ठाकरे
जालना: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जालना येथील चारा छावण्यांना भेट देऊन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जनावरांसाठी पशुखाद्याचे वाटप केले. या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, कृषि राज्यमंत्री अर्जुन खोतकर व माजी खासदार चंद्रकांत खैरे उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले की, “मराठवाड्याचा दुष्काळ संपेपर्यंत शिवसेना तुमच्या खांद्याला खांदा लावून दुष्काळाशी लढणार!”
शिवसेनेनेच पहिली कर्जमुक्ती केली होती. मागच्या सरकारने फक्त प्रकल्पांची स्वप्न दाखवली मात्र आम्ही ही स्वप्न पूर्ण करणार असे आश्वासनही त्यांनी दिले.
कर्जमुक्तीच्या विषयाबाबत ते पुढे म्हणाले की कर्जमुक्ती ही प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे हा शिवसेनेचा हट्ट आहे.
शेतकऱ्यांकडून पीक विम्याची सर्व माहिती गोळा करण्याचे आदेश मी शिवसैनिकांना दिले असल्याचेही ते या प्रसंगी म्हणाले.
सध्या महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला आहे. त्यातच या वर्षी मॉन्सून कमी पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अशा परिस्थितीत विशेषतः मराठवाड्यात शेतकऱ्यांसाठी राजकीय पक्ष, निरनिराळ्या सामाजिक संस्था यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.