उद्धव ठाकरे यांनी केले समर्थ, संपन्न हिंदुस्थानसाठी भगव्याला विजयी करण्याचे आवाहन
लातूर: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महायुतीची महासभा लातूर जिल्ह्यातील औसा येथे सुरू आहे. या सभेच्या निमित्ताने प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र आले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी लातूर येथील महायुतीच्या सभेत बोलताना भाजपच्या जाहीरनाम्याबाबत मोदींना धन्यवाद दिले. जाहीरनाम्यातील वचनांमुळेच शिवसेना आणि भाजपाची युती झाली आहे. राम मंदिर, काश्मीरचे 370 कलम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी हा जाहीरनाम्याचा केंद्रबिंदू असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
काँग्रेसने जुनाच जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात किती थापा आहेत. इंदिरा गांधींपासून देशात गरिबी आहे. केवळ गांधी घराण्याची गरिबी गेली, पण सर्वसामान्यांची गरिबी कधी जाणार? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी आपल्या सभेत विचारला.
पाकिस्तानने कुरापत काढली तर, आम्ही केवळ बोलून दाखवत नाही की ठोकून काढू, आम्ही ते करुन दाखवलं आता पाकिस्तानचा अंश देखील शिल्लक राहता नये, असा तोडगा काढा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे केली.
मराठवाडा ही मर्दांची भूमी आहे, संतांची भूमी आहे, रझाकारांविरुद्ध लढणारी ही भूमी आहे. वल्लभाई पटेल रझाकार या सुलतानी संकटाशी लढले, आता नरेंद्रभाईंनी असमानी संकटावेळी आमच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहावे हीच अपेक्षा असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले.
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात विमा कंपन्यांचे कार्यालय असले पाहिजे अशी मागणी त्यांनी पंतप्रधान मोदींकडे केली.
नरेंद्र मोदींना परत पंतप्रधान करायचं म्हणजे करायचंच. समर्थ, संपन्न हिंदुस्थानसाठी भगव्याला विजयी करण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी उपस्थित यावेळी मराठवाडयातील जनतेला केले.