“स्मृतीजी अमेठीची काळजी घ्या”; पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांची स्मृती इराणी यांना विनंती
नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणुकांच्या निकालानंतर पत्रकार परिषदेत अमेठीच्या जागेवर आपला पराभव मान्य केला व विजयी उमेदवार स्मृती इराणी यांचे अभिनंदनही केले. विशेष बाब ही की अधिकृत निकाल जाहीर होण्यापुर्वीच राहुल गांधी यांनी आपला पराभव स्वतःहून मान्य केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही भाजपच्या विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की आमची लढाई ही विचारधारेशी आहे.
काँग्रेस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले की, ” अमेठी मधून स्मृती इराणी यांनी विजय संपादित केला आहे. मी अपेक्षा बाळगतो की त्या प्रेमाने अमेठीच्या जनतेची काळजी घेतील.”
त्यांनंतर त्यांनी निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी घेतली व म्हणाले की, ” मी मीडियाचे आभार मानतो. आमची भाषा प्रेमाची आहे आणि प्रेम कधी हरत नसतं. १०० टक्के मी अपयशाची जबाबदारी घेतो. ही विचारधारेची लढाई आहे. काँग्रेस च्या कार्यकर्त्यांना मी सांगू इच्छितो की आम्ही लढू आणि विचारधारेला विजयी करू.
अमेठीतला पराभव हा राहुल आणि एकूणच गांधी परिवारासाठी मोठा पराभव मनाला जातो. त्यामुळे ही त्यांच्यासाठी धोक्याची घंटा असू शकते.