आज खऱ्या अर्थाने आपला देश पूर्णपणे स्वतंत्र झाला : उद्धव ठाकरे
मुंबई: आज राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कलम ३७० रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव मांडला. आणि त्यांनंतर देशभरातून मोदी सरकारचे अभिनंदन केले जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विशेष पत्रकार परिषद घेत मोदी सरकारचे अभिनंदन केले आहे.
या प्रसंगी उद्धव ठाकरे म्हणाले की, “आज एक ऐतिहासिक दिवस आहे. काश्मीरबाबत बाळासाहेब ठाकरे तसेच अटल बिहारी वाजपेयी यांचे स्वप्न होते ते आज पूर्ण झालेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमी शाह यांनी आज जगाला दाखवून दिल आहे की, आपल्या भारतामध्ये अजूनही पोलादीपणा टिकून आहे. त्यांचे आज मी मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि मला याचा सार्थ अभिमान देखील आहे.
ते पुढे म्हणाले की, “१५ ऑगस्ट ला अजून वेळ आहे परंतु मी असं म्हणेन की, आज खऱ्या अर्थाने आपला देश पूर्णपणे स्वतंत्र झाला. मी सर्व राजकीय पक्षांना असं सांगेन की, हा कोणत्याही राजकीय पक्षा पुरता मर्यादित विषय नसून देशाच्या एकसंघपणाचा विषय आहे याचे स्वागत सगळ्या राजकीय पक्षांनी केले पाहिजे.”
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे
# शिवसेना आणि भाजपच्या वचननाम्यातील एक वचन आज पूर्ण झालेले आहे.
# इतक्या वर्ष उराशी बाळगलेले स्वप्न आज पूर्ण झाल्याचे पाहून जर आज बाळासाहेब जिवंत असते तर त्यांना खूप आनंद झाला असता.
# या निर्णयाबाबत जे कोणी आदळा-आपट करतील किंवा विरोध करतील त्यांचा सामना करण्यासाठी सरकार समर्थ आहे.
# काश्मीर हा देशाचा अविभाज्य भाग होता आणि राहील.
# राजकारण बाजूला ठेवून देशहिताच्या निर्णयाचे स्वागत करा.
# आपल्या देशाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपले सरकार समर्थ आहे याचा नागरिकांना अभिमान वाटला पाहिजे.
# काश्मिरी पंडित जेव्हा त्यांचे घर सोडून पलायन करत होते त्यावेळेला पुर्ण हिंदुस्तानात फक्त बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना पाठिंबा दिला आणि त्यांची पाठराखण केली मजबूती दिली आणि त्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळालं पाहिजे असे बाळासाहेबांचे मत होते.
# मी तमाम शिवसेनेकडून तसेच भारतातल्या आणि जगभरातल्या देशाच्या कट्टर हिंदूंकडून या सरकारचे अभिनंदन करतो.
