देवेंद्र फडणवीस शिवसेनेला म्हणाले “सत्तेसाठी लाचार”
नागपूर: नागपूर येथे होणाऱ्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर जहरी टीका केली. ते म्हणाले की, “सत्तेसाठी लाचारी शिवसेनेला लखलाभ! कालपर्यंत जितकी आक्रमक शिवसेना याबाबतीत होती, तशी आता राहिली नाही.
कालचे शिवसेनेचे वक्तव्य पाहून शिवसेनेची कीव करावीशी वाटते.” यावेळी चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचेही जाहीर केले.
फडणवीस यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे:
१) जाणीवपूर्वक आणि भविष्यात हात वर करता यावे म्हणून राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत चुकीचे चित्र निर्माण केले जाते आहे. शिवसेना गेली 5 वर्ष आमच्यासोबत सत्तेत होती. सामूहिक जबाबदारीतूनच आम्ही सोबत निर्णय घेतले.
राज्याची आर्थिक स्थिती उत्तम.
२) हे स्थगिती सरकार आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात असंतोष तयार झाला आहे. नागरिकांवर तर परिणाम झालाच, पण गुंतवणूकदार सुद्धा आता महाराष्ट्राकडे येणार नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
३) चर्चेची संधी दिली, तर चर्चेच्या माध्यमातून, नाही दिली, तर विविध आयुधं वापरून जनतेचे प्रश्न सोडवू.
४) स्वातंत्र्यवीर सावरकर यांची गाथा राहुल गांधी यांनी पाहिली नाही, त्यांना त्याची जाण असण्याचा प्रश्नच नाही.
वीर सावरकर यांनी जे बलिदान केले, ते राहुल गांधी यांना समजणे शक्यच नाही. उभा देश यामुळे पेटून उठला आहे. शिवसेना इतकी सौदेबाजी करेल, याची कल्पना केली नव्हती.
५) ना मंत्री, ना निर्णय
हे केवळ स्थगिती सरकार!
वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांच्या चहापानाला आम्ही जाणार नाही.