शतावरी कल्प – एक वरदान
प्रसंग १
काल ती मंगला वहिनींची सून बाळंत झाली. सिझेरिअन करून घेतले. दोघं बाळ – बाळंतीण सुखरूप आहेत. पण आईला दुधच येत नसल्यामुळे पहिल्या दिवसापासून बाळाला बेबी फूड सुरु केलंय.
प्रसंग २
प्रसुता वय वर्ष ३५. मोठ्या प्रयत्नानंतर बाळ झालं, पण आईला दुधच येत नाही.
प्रसंग ३
आईला गर्भार पणात खूप त्रास झाला, प्रसूती नॉर्मल झाली पण बाळाचं वजन मात्र कमी आहे.
प्रसंग ४
वय वर्ष ३०. सुरुवातीपासूनच अंगावरून जास्त रक्त जायचे. गर्भ राहायचाच नाही किंवा राहिलाच तर ४-५ महिन्यात गर्भस्त्राव किंवा गर्भपात होतो.
प्रसंग ५
रुग्णा ३८ वर्षांची. पाळी फार अनियमित, ३-४ महिन्यांनंतर यायची. रुग्णा छोट्या-छोट्या कारणांवरून मुलांवर रागावते अशी घरच्यांची तक्रार. हातापायांच्या तळव्यांची खूप जळजळ होते, अस्वस्थ वाटते. थायरॉईडची औषधे चालू आहेत पण आराम मिळत नाही ह्या आणि अशा खूप जणी त्रासलेल्या आढळतात.
मुळात आईचं दुध बाळाला मिळालंच पाहिजे. हल्ली वाढलेलं वय, अन्य कामात गुंतलेलं मन किंवा वेगवेगळ्या उपचारांनंतर जर मूल झालेलं असेल तर अशा वेळी आईला दुध फार कमी येते किंवा येतंच नाही. पहिल्या दिवसापासूनच बाळाला वरचे दुध दिले जाते आणि मग बाळ बाटलीलाच सरावते.
आईला धरतच नाही किंवा सोय म्हणून मग आई बाळाला त्याचीच सवय लावते. पण आईचे दुध हा बाळाचा परिपूर्ण आहार आहे, त्याने बाळाची सर्वांगीण वाढ होते, बाळाची प्रतिकार शक्ती वाढते तसेच बाळ आणि आईत जवळीक वाढत जाते. आईचे गर्भाशयही त्यामुळे व्यवस्थित संकुचित होते, आईला प्रसूतीनंतर येणारी पाळी लांबते. आयुर्वेदात या सर्व तक्रारी दूर करणारी शतावरी ‘रसायन वरा’ म्हणजेच सगळ्या रसायनांत श्रेष्ठ सांगितली आहे.
गुरु, स्निग्ध गुण असलेली शतावरी चवीला गोड पण थोडीशी कडवटच असते, शीत वीर्यामुळे ती पित्त शमन करते आणि मधुर गुरु असली तरी तिखट रसामुळे कफाच्या वाढीवरही अंकुश ठेवते.
शतावरीचे गुण
१. रसायनवरा – सर्व रसायनांत श्रेष्ठ
२. मेध्य – उत्तम बुद्धिवर्धक
३. वृष्य – शुक्रधातू वाढवणारी
४. हृद्या – हृदयाला हितकारक
५. अग्निवर्धिनी – भूक वाढवणारी
६. बलवर्धिनी – बल वाढविते
७. नेत्रा – डोळ्यांना हितकारक
ग्रहणी, अर्श, गुल्म, अतिसार या रोगांना बरे करते.
आधुनिक वैद्यक शास्त्रानेही शतावरीच्या या गुण आणि उपयोगांना पुष्टी दिली आहे. आधुनिक द्रव्यगुण शास्त्रानुसार शतावरीत सोडियम ची मात्रा कमी असते. शतावरीत व्हिटॅमिन बी ६, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन इ, व्हिटॅमिन के उत्तम प्रमाणात असतात. बिटा कॅरोटीन, थायमिन, रायबोफ्लेविन, निएसीन, फॉलीक ऍसिड शतावरीच्या कंदात असतात. कॅल्शिअम, मग्नेशियम, झिंक, कॉपर, पोटॅशियम, मँगनीज, सेलेनीयम, आर्यन हे धातू असतात. या व्यतिरिक्त शतावारीत क्रोमियमही अल्प प्रमाणात आढळते जे इन्सुलिनची रक्तातले ग्लुकोज पेशींकडे पोहोचवण्याची क्षमता वाढवते.
हे सारे शतावरीचे गुण शतावरी कल्प सेवनाने मिळतात. नुसतीच दुधात शतावरी उकळून घेण्यापेक्षा शतावरी कल्प अधिक उपयोगी ठरतो.
१. लहान मुलांनी घेतल्याने शारीरिक, मानसिक वाढ उत्तम होते, ग्रहणशक्ती, स्मरणशक्ती वाढते.
२. वयात आलेल्या मुलींत, स्त्रियांत पाळी व्यवस्थित वेळच्या वेळी नियमित योग्य प्रमाणात यायला सुरुवात होते.
३. गरोदरपणात घेतल्याने गर्भाचे उत्तम पोषण करते, रक्तदाब नियंत्रणात ठेवते, गर्भाशयाच्या पेशींना बळ देते, कंबर दुखणे कमी करते.
४. मूत्रल गुणामुळे लघवी उत्तम होते.
म्हणून अशा सखीला प्रत्येक स्त्रीने आपल्या निरोगी आयुष्यासाठी आपल्या आयुष्याची सखी जरूर बनवा.
डॉ. सौ. उल्का कुरबेट
एम.डी.
(आयुर्वेद)
लेखिका ह्या गेल्या १५ वर्षे हुन अधिक काळापासून नवी मुंबई येथे आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून सुपरिचित आहेत.
(Disclaimer: सदर लेखातील मते हि लेखक/लेखिकेची स्वतःची मते आहेत. न्युज पोर्टल फक्त एक माध्यम आहे.)