मुंबई: आज देशाचे माजी कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा जन्मदिन. या जन्मदिनाचे औचित्य साधून शरद पवार यांनी आपलं मनोगत फेसबुक च्या डिजिटल भिंतीवर मांडलं.
“आजचा दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. माझा वाढदिवस आहे म्हणून नाही, तर १२ डिसेंबर याच दिवशी माझ्या मातोश्रींचाही जन्म झाला म्हणून! १३ डिसेंबर हा माझ्या पत्नीचा वाढदिवस, तसेच याच आसपास माझ्या अनेक जवळच्या मित्रांचा वाढदिवस येतो, त्यामुळे हा दिवस माझ्या नेहमी लक्षात राहतो.
माझ्या मातोश्रींनी मोठे कष्ट घेऊन आम्हाला वाढवले. त्या शेती करायच्या, तर वडील नोकरी करायचे. शेतीत जे काही पिकत असे, ते बाजारापर्यंत नेण्याची व्यवस्थाही करायचे. त्या काळातही आमच्या मातोश्रींच्या विचारांची झेप मोठी होती. त्या लोकल बोर्डावर काम करत होत्या. आपल्या समाजाचा विकास कसा करायचा या विचाराने भारावलेल्या होत्या. मुलींच्या शिक्षणासाठीही त्या सदैव आग्रही असत. मातोश्रींच्या पावलावर पाऊल ठेवूनच आज आम्ही सारे कार्य करत आहोत.
सार्वजनिक जीवनात वावरत असताना यश-अपयश हे येत असते. मात्र या साऱ्यातून उठून उभे राहण्याची ऊर्जा जर मला कोणाकडून मिळाली असेल तर माझ्या आईकडून आणि महाराष्ट्राच्या सर्वसामान्य माणसांकडून मिळाली आहे.
आपण ज्या माणसांच्या परिवर्तनासाठी, परिस्थिती सुधारण्यासाठी लढतोय त्यांची शक्ती आपल्याला मिळाली तर कोणतंही संकट आपण पार करू शकतो. त्यामुळेच मी माझ्या सहकाऱ्यांनी नेहमी सांगत असतो की आपलं जीवन हे समाजाच्या शेवटच्या माणसाच्याही उपयोगाला यायला हवं.
आज ८० लाख रुपयांचा निधी शेतकऱ्यांसाठी दिला गेला आहे. अनेकांनी स्वयंस्फूर्तीने बळीराजासाठी मदत दिली आहे. ही रक्कम राष्ट्रवादी वेलफेअर फंड मध्ये जाणार आहे. आज आत्महत्या, कर्जबाजारीपणा, नापिकी, दुष्काळ अशा विविध कारणांमुळे राज्यातील अनेक शेतकरी कुटुंबे उघड्यावर पडली आहेत.
हा निधी उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांमधील मुलांच्या शिक्षणासाठी वापरला जाईल. संकटात सापडलेली असंख्य कुटुंबं आपल्याला उभी करायची आहेत. तुम्ही दिलेल्या बळीराजा कृतज्ञता कोषाचा मी कृतज्ञतापूर्वक स्वीकार करतो आणि आपले आभार व्यक्त करतो.
# बळीराजाकृतज्ञतादिन