एक गोष्ट चांगली आहे, सरकार येणार नाही म्हणून ते चालले आहेत हे त्यांनी जाहीर केले : शरद पवार
सातारा: राष्ट्रवादी पक्ष सध्या मोठ्या नेत्यांच्या आउटगोइंग मुळे त्रस्त आहे. याच मुद्द्यावर पत्रकारांनी छेडले असता राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, “पक्षातील कुणी मंडळी जर काही वेगळा निर्णय घेत असतील, तर आमच्या त्यांना शुभेच्छा! राजकारणात कधी कधी असा प्रसंग येतो, त्याचा सामना करायचा मला अनुभव आहे. एक गोष्ट चांगली आहे, सरकार येणार नाही म्हणून ते चालले आहेत हे त्यांनी जाहीर केले.” आज ते सातारा येथे आपल्या प्रमुख शिलेदारांसोबत आले होते.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंबद्दल ते म्हणाले की, “भाजपमध्ये जाणार नाही असं शिवेंद्रराजेंनीच मला सांगितलं होतं. साताऱ्याच्या खासदारांसोबत बैठक व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. संसदेच्या अधिवेशनानंतर चर्चा करू असं आमचं ठरलं होतं. मात्र, त्याआधीच त्यांनी वेगळा निर्णय घेतला.” शिवेंद्रराजे भोसले भाजपमध्ये गेल्याचा कोणताही परिणाम साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसवर होणार नाही. साताऱ्याच्या उमेदवारीसाठी माझ्याकडे तीन अर्ज आले आहेत. मला उमेदवारांची चिंता नाही. ही जागा राष्ट्रवादी निश्चित राखेल असेही ते पुढे म्हणाले.
भाजपवर टीका करताना ते म्हणाले की, “राष्ट्रवादीच्या आमदारांनी पक्ष सोडताना कामं होत नसल्याची कारणं दिली आहेत. ते एक बरंच झालं. सत्ताधारी सूडबुद्धीनं वागताहेत आणि विरोधक त्यांना तोंड देऊ शकत नाहीत, असा निष्कर्ष यातून निघतो.” शेवटी ते म्हणाले की, “साताऱ्यातून आणखी किती लोक पक्ष सोडून जाणार आहेत याची मला कल्पना नाही. मात्र, यशवंतराव चव्हाणांचा विचार ज्यांनी स्वीकारलाय ते असं काही करणार नाहीत. त्यांना विरोधात असल्याचा त्रास होईल. मात्र, त्यांची नाळ मतदारांशी असल्यानं चिंता करण्याची गरज नाही.”
सध्या स्वतः पक्षाचे अध्यक्षच रण मैदानात उतरल्याचे पहावयाला मिळत आहे.