भारताच्या एअर स्ट्राईकवर सॅम पित्रोदांकडून अनेक वादग्रस्त प्रश्न उपस्थित
नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीय सॅम पित्रोदा यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. भारताच्या हवाई हल्ल्यात खरंच ३०० दहशतवाद्यांचा मृत्यू झाला का? काहीजण येऊन हल्ले करत असतात. त्यासाठी संपूर्ण देशाला दोषी धरणार का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.
पित्रोदा म्हणाले, भारताने खरंच असा हल्ला केला का? आपण खरंच ३०० दहशतवादी मारले? जर तुम्ही म्हणता की ३०० दहशतवादी मारले, तर सर्व भारतीयांना याचा पुरावा मिळायला हवा. कारण, या हल्ल्यात कोणीही ठार झालेले नाही, असं आंतरराष्ट्रीय माध्यमे म्हणत आहेत. त्यामुळे भारतीय नागरिक म्हणून मला याचे वाईट वाटते, असे त्यांनी सांगितले.
भारताने केलेल्या हवाई हल्ल्याबाबत सॅम पित्रोदा म्हणाले की, काही लोकांच्या चुकीच्या वागण्यामुळे पाकिस्तानला दोषी ठरवता येणार नाही. तसेच पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकवर केलेल्या कारवाईची पद्धत चुकीची होती. भारतावर अशा प्रकारचे हल्ले यापूर्वीही झाले आहेत. मुंबईवर २६/११चा हल्ला झाला. त्यावेळी आम्हीदेखील विमानं पाठवू शकत होतो. मात्र असं करणं योग्य नाही.