RVNL ही रेल्वे विभागाची सार्वजनिक क्षेत्रातील केंद्रीय कंपनी आहे
नवी दिल्ली/मुंबई, दि. ४: रेल्वे विभागाची सार्वजनिक क्षेत्रातील केंद्रीय कंपनी, (RVNL) रेल विकास निगम लिमिटेडला नवरत्न हा दर्जा मिळाला आहे. २४ जानेवारी २०२३ रोजी आरवीएनएलची सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी म्हणून स्थापना करण्यात आली होती. रेल्वेशी संबंधित पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठीच्या क्षमता निर्माण करण्यासाठीच्या प्रकल्पांची जलदगतीने अंमलबजावणी करणे, आणि एसपीव्ही म्हणजे स्पेशल पर्पज व्हेईकल प्रकल्पांसाठी निधी उभारणे, अशा दोन प्रमुख उद्दिष्टांसाठी, या कंपनीची स्थापना करण्यात आली होती. कंपनीने, २००५ साली संचालक मंडळाची नियुक्ती करून आपल्या कामांना सुरुवात केली. सप्टेंबर २०१३ मध्ये कंपनीला मिनी रत्न दर्जा देण्यात आला. कंपनीचे अधिकृत भाग भांडवल, ३००० कोटी रुपये इतके असून त्यापैकी, थेट समभाग भांडवल, २०८५ कोटी रुपये इतके आहे.
आरव्हीएनएल कडे खालील जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत:
- प्रकल्पाच्या संपूर्ण कालचक्राच्या व्याप्तीकाळात, प्रकल्प विकास आणि अंमलबजावणीची जबाबदारी घेणे.
- काही व्यक्तिगत कार्यासाठी, गरज पडल्यास, प्रकल्प विशिष्ट एसपीव्ही निर्माण करणे.
- आरव्हीएनएल ने रेल्वे प्रकल्प पूर्ण केल्यावर, संबंधित क्षेत्रीय रेल्वे त्या प्रकल्पाचे कार्यान्वयन आणि देखभालीची जबाबदारी घेईल.
आरव्हीएनएल ला “नवरत्न” दर्जा प्रदान केल्याने अधिक अधिकार, अधिक परिचालन स्वातंत्र्य आणि आर्थिक स्वायत्तता मिळेल, ज्यामुळे आरव्हीएनएलच्या प्रगतीला मोठी चालना मिळेल, विशेषत: रेल्वेक्षेत्राच्या पलीकडे असलेल्या क्षेत्रांमध्ये आणि परदेशातील प्रकल्पांमध्येही आरव्हीएनएल आपला ठसा उमटवत आहे.