जाणून घ्या भातावर योग्य संस्कार करून वजन आटोक्यात कसे आणावे
आयुर्वेद कुतूहल
शालिधान्य (भात, तांदूळ) भाग २
मागील लेखात आपण तांदळाचे गुण त्याच्यावर शेतात होणाऱ्या प्रक्रियेमुळे त्याचे गुण पहिले आज आपण आपल्या हातात जेव्हा तांदूळ येतो तेव्हा त्यावर कशाप्रकारे संस्कार करावेत जेणेकरून तो पचायला सुलभ होईल ते पाहूया.
संस्कार(४) – पुराण धान्य ग्रहण
आयुर्वेदात धान्य हे पुराण म्हणजे जुने घेण्यास सांगितले आहे, जुने म्हणजे धान्य एक वर्ष जुने असल्यास ते पचायला हलके असते म्हणून जुना तांदूळ हा भातासाठी घ्यावा
संस्कार(५) – नवधान्यावरील उपाय
प्रत्येक वेळी आपल्याला जुना तांदूळ मिळेलच असे नाही मग अशा वेळी नव्या तांदळावर काही उपाय करावे लागतात. ते धुऊन वाळवून जर ते थोडे भाजले आणि मग त्याचा भात केला तर असा भात पचायला हलका होतो.
संस्कार(६) – शिजवणे
हा भातावरील मूळ संस्कार आहे त्यामुळे भाताचे गुण बदलतात, आयुर्वेदात प्रथम तांदूळ घेऊन त्यात पाच पट पाणी घालून तो शिजवतात आणि मग उरलेले पाणी काढून टाकले जाते जेणेकरून त्याचा अधिक असलेला क्लेद चिकटा निघून जातो आणि तो भात पचायला हलका होतो. उरलेली भाताची निवळी(पाणी) जर त्यास तुपावर जिरे,मिरे,हिंग अशी फोडणी दिली आणि त्यात सैंधव घातले तर ते मंड म्हणून तयार होते ते देखील पथ्याकाराकच आहे.
**त्या ऐवजी कुकर मध्ये शिजवलेला भात ते पाणी त्यातच मुरल्यामुळे तो भात पचायला जडच होतो.
** काही ठिकाणी भात शिजवताना त्यात लवंग,दालचिनी, तेजपात्ता असे पदार्थ टाकण्याची पद्धत आहे, त्यामुळे भाताला नुसता सुगंध येत नाही तर त्या मसाल्याचे अर्क त्यात उतरल्यामुळे तो भात पचायला हलका होतो.
**आयुर्वेदात आहारात भाताचे महत्व**
आयुर्वेदात पंचकर्माच्या शोधना नंतर, ताप असताना रुग्ण अवस्थेत ह्यास महत्व आहे. ह्यावेळी रुग्णाची पाचन शक्ती कमी असते व रुग्णास बळ वाढवण्याची गरज असते अशावेळी रुग्णाच्या पाचन शक्ती नुसार भाताचे विविध प्रकार करून आहारात समावेश करण्यात येतो.
१) मंड – (तांदळाची निवळ)तांदूळ १भाग+१४भाग पाणी – भात शिजला की त्यातील फक्त पाणी घ्यावे
२) पेया (पेज) – तांदूळ १भाग+८भाग पाणी -भात शिजला की ते ग्रहण करावे
३) विलेपी (खिमटी) – तांदूळ १भाग+६भाग पाणी -भात शिजला की ते ग्रहण करावे
४) ओदन (भात) – तांदूळ १भाग+५भाग पाणी -भात शिजला की त्यातील अधिक पाणी काढून भात वाफेवर शिजवावा.
भाताचे हे प्रकार उत्तर उत्तर पचायला जड आहेत म्हणूनच व्यक्तीच्या पाचन शक्ती नुसार त्याचे ग्रहण करावे, तसेच वरील पदार्थ नुसते सैंधव घालून शिजवू शकतो अथवा त्यास तुपात जिरे,मिरे,हिंग,अशी फोडणी देखील देऊ शकतो ज्यामुळे त्यास चव येते.
एवढा गुणकारी भात आपण आहारातून का टाळावा?, म्हणूनच सांगतो वजन भाताने नाही त्याच्या शिजवण्याच्या पद्धतीने वाढते आणि शारिरिक श्रम न करता काहीही खाल्लं नाही तरी वजन वाढणारच तेव्हा भाताचा हा गैरसमज दूर करा आणि जेवणात एक भाताची मूद अवश्य वाढून घ्या.
भेटूया पुढल्या लेखात नवीन विषय घेऊन तोपर्यंत
आयुष्य जगा आयुर्वेदा संगे ।।
वैद्य शार्दुल चव्हाण
एम. डी. आयुर्वेद
9987925720
जगदंब The Ayurvedic World ,
Ayurvedic Clinic and Panchkarma Center
(Disclaimer: सदर लेखातील मते हि लेखक/लेखिकेची स्वतःची मते आहेत. न्युज पोर्टल फक्त एक माध्यम आहे.)