चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, राज्यातील १७ लोकसभा मतदारसंघामध्ये शेवटचा रणसंग्राम
लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. देशभरातील ९ राज्यांमधल्या ७१ जागांसाठी आज मतदान होत आहे. महाराष्ट्रातील १७ लोकसभा मतदारसंघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. चौथ्या टप्प्यात ठाणे, कल्याण, भिवंडी, मुंबई उत्तर, मुंबई वायव्य, ईशान्य मुंबई, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण, मावळ, शिरूर, शिर्डी, नाशिक, दिंडोरी, नंदुरबार व धुळे या मतदारसंघांत आज मतदान होत आहे.
चौथ्या टप्प्यातील प्रमुख लढतींपैकी शिरूर, मावळ, दक्षिण मुंबई, मुंबई उत्तर, ठाणे, धुळे व नाशिक या मतदार संघातील लढतींकडे समस्त महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर, अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार, शिवाजीराव आढळराव पाटील, अभिनेते अमोल कोल्हे, अरविंद सावंत, पूनम महाजन, प्रिया दत्त यासारख्या दिग्गजांचं भवितव्य मतयंत्रांमध्ये बंद होणार आहे.
सकाळच्या सत्रात मतदानकेंद्रांवर गर्दी पाहावयाला मिळतेय.