वाचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नाशिक येथील भाषणातील ठळक मुद्दे
नाशिक: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नाशिक येथे जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या साऱ्यांचा समाचार घेतला.
सभेतील ठळक मुद्दे
१) सह्याद्रीच्या रांगा पाहून उर भरून येतो, ह्या रांगा सांगत असतात की मी जसा ताठ कण्याने उभा आहे तसंच महाराष्ट्राने उभं रहायला हवं पण तोच महाराष्ट्र आज थंड बसलाय, महाराष्ट्राची सळसळती मनगटं कुठे गेली असा प्रश्न बहुदा सह्याद्रीच्या रांगांना देखील पडत असावा.
२) हिंदुस्थान एरॉनटिक्स लिमिटेड, जिथे देशाची विमानं बनतात तिथला कामगार रडतोय कारण त्यांचा पगार होत नाहीये. हा कामगार देशोधडीला लागायची वेळ आली आहे तरी सगळे थंड. लोकंच जर थंड राहणार असतील तर आम्ही निवडणुका लढण्याला आणि उमेदवार उभं करण्याला अर्थ आहे.
३) ह्यापुढे लोकांना अडवून, रस्ते अडवून, ट्रॅफिक होईल असं काहीही करून, थोडक्यात जेणेकरून लोकांना त्रास होईल असं माझं स्वागत ह्या पुढे करू नका. आणि हे माझं आवाहन महाराष्ट्रातील तमाम महाराष्ट्र सैनिकांना आहे.
४) शिवसेना भाजप ताटवाट्या घेऊन फिरतात, एक म्हणतोय की १० रुपयात जेवण देऊ तर दुसरा म्हणतोय की ५ रुपयात जेवण देऊ. महाराष्ट्राला काय भीक लागल्ये का?
५) एकहाती सत्ता घेऊ म्हणणारे, युतीत आमची ५ वर्ष सडली म्हणणारे पुन्हा युतीत का गेले? आणि पुन्हा भाजपने शिवसेनेला नाशिक पुण्यात एकही जागा दिली नाही तरीही हे गप्प, इथल्या शिवसैनिकांनी काय करायचं?
६) काश्मीरमधलं ३७० कलम काढलं ह्यावर अमित शाह महाराष्ट्रातल्या निवडणुकांमध्ये बोलत आहेत, ३७० कलम काढलं त्याबद्दल अभिनंदन पण महाराष्ट्रातली शहर बकाल होत आहेत, इथले उद्योगधंदे बंद झाले, इथला रोजगार बुडतोय, ह्यावर कधी बोलणार?
७) नोटबंदीनंतर नरेंद्र मोदी म्हणाले होते की मला ५० दिवस द्या सगळी परिस्थिती सुधारेल? काय झालं, ३ वर्ष झाली? अभिजित बॅनर्जी ज्यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला, त्यांनी देखील ह्या नोटबंदीवर कडाडून टीका केली होती.
८) नाशिकमध्ये ५ वर्षात आम्ही जे काम करून दाखवलं, ते अनेकांना महापालिका २५,२५ वर्ष सत्ता असून देखील करता येत नाही. इतकं काम करून देखील हाती पराभव येतो तेंव्हा प्रश्न पडतो की तुम्हाला नक्की काय हवंय?सध्या जे नाशिक शहर ओरबाडण्याच काम चालू आहे ते मान्य आहे का तुम्हाला?
९) कधी कधी प्रश्न पडतो की नाशिकमध्ये जी कामं मी केली, ती करायला हवी होती का नव्हती? पण एक सांगतो की माझा पराभव झाला तरी माझं नाशिकवरचं प्रेम कमी झालेलं नाही आणि पुन्हा संधी मिळाली तर नाशिकमध्ये ह्याहून अधिक चांगलं काम करून दाखवेन.
१०) नाशिक शहराच्या महापालिकेवर आर्थिक बोजा नको म्हणून मी सीएसआर मधून फंड आणला, इतर ठिकाणी असं कधी होताना तुम्ही पाहिलं आहे का? मी हे केलं कारण शहरं घडवणं हे माझं पॅशन आहे. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवणं हे माझं स्वप्न आहे.
११) शेतकरी आत्महत्या करत आहेत. आज वैजापूरच्या सभेत म्हणलं तसं, शेतकऱ्यांनो आत्महत्या कसली करताय, उलट ज्यांच्यामुळे ही वेळ आली आहे त्यांना मारा.
१२) सव्वाशे वर्ष मराठेशाहीने ह्या संपूर्ण भूप्रदेशावर राज्य केलं होतं पण आपला इतिहास पोहचवला जात नाही. त्या वैभवशाली इतिहासाचा प्रचार-प्रसार सरकारने करायचा असतो. पण हे सरकार पुतळ्यांची स्मारकं करण्याच्या घोषणेत मश्गुल.
१३) टोलच्या विरोधात रस्त्यावर उतरून जेंव्हा आम्ही आंदोलन केलं तेंव्हा महाराष्ट्रातील ७८ टोल नाके बंद पडले. फक्त रस्त्यावर तांडव करून जर इतकं काम होत असेल तर विधानसभेत माझी माणसं गेली तर काय होऊ शकतं ह्याचा विचार करा.
१४) महाराष्ट्राला आज गरज आहे एका प्रबळ सक्षम विरोधी पक्षाची, एक असा विरोधी पक्ष जो कोणाही समोर घरंगळत जाणार नाही, कोणतीही सेटलमेंट करणार नाही. आणि म्हणून मी तुमच्याकडे मागणं मागायला आलोय की माझ्या पक्षाला ह्या सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावायची आहे.