सगळी खोटी आश्वासनं देणाऱ्या आणि खोटं बोलणाऱ्या मोदींना कोणत्या निकषांवर मतं द्यायची? : राज ठाकरे
नाशिक: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल नाशिक येथे हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आयोजित सभेत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. नाशिक येथील सभेची सुरुवात राज यांनी मनसेने केलेल्या ५ वर्षातील विकास कामांचा व्हिडीओ दाखवून केली. नाशिककरांनी मनसेच्या हातून सत्ता काढून घेतली याचं जास्त वाईट वाटलं पण जी कामं केली ती केली. मला वाईट वाटलं पण मी खोटी भाषणं केली नाहीत असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
नाशिक शहर दत्तक घेतलेल्या मुख्यमंत्र्यानी नाशिकसाठी काय काय केले? असा प्रश्न विचारत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीका केली. स्मार्ट सिटीच्या नावाखाली नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेलीच कामं भाजपने आम्ही केली असं सांगत संपूर्ण राज्याला मूर्ख बनवले. १ लाख २० हजार विहिरी बांधल्याचे मुख्यमंत्री सर्वांना सांगत आहेत, नाशिकच्या त्रंबकेश्वर येथील अनेक गावात तळ गाठलेल्या विहिरीत महिला दोरखंडाने उतरताना व्हिडीओ दाखवून फडणवीस यांनी खोदलेल्या विहिरी गेल्या तरी कोठे? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी केला.
२०१४च्या निवडणुकांआधी राज्यात सिंचन घोटाळा झाला असे सर्वांना वाटत होते. त्यावेळी मी तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांवर तुटून पडलो होते. त्यावेळी सिंचन घोटाळ्यातील भ्रष्टाचारावर भाजपचे नेते घसा फोडून ओरडत होते. पण सत्तेत आल्यावर देवेंद्र फडणवीसांनी ज्यांच्यावर आरोप केले होते त्या सुनील तटकरे आणि अजित पवारांवर का कारवाई केली नाही? असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला.
विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की भाजप सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईल. पण याच भाजपा सेनेच्या काळात राज्यात १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आपण सर्वांनी एकत्र येत या भाजपाचा सत्तेचा माज उतरवला पाहिजेत, अस आवाहन राज ठाकरेंनी केलं.
नरेंद्र मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयामुळे साडेचार कोटी लोक बेरोजगार झाले. देशातील जनतेला कोणत्याही प्रकारची कल्पना न देता एकट्या मोदींनी नोटबंदीचा निर्णय जाहीर केला आणि देशाला वेठीला धरलं असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. कपिल सिब्बल यांनी या संदर्भात एक पत्रकार परिषद घेतली ती वाहिन्यांवर दाखवण्यातच आली नाही. नोटाबंदीच्या माध्यमातून देशाला मूर्ख बनवण्याचा प्रकार मोदींनी केला असाही आरोप राज ठाकरेंनी केला.
भाजप सरकारच्या काळात २०१६ पर्यंत ३८ हजार बलात्कार झाल्याची नोंद आहे. त्यानंतर देशात बलात्कारांचे गुन्हे किती झाले, बेरोजगारीचं प्रमाण काय आहे ह्याचे आकडे बाहेर येऊ दिले नाही. प्रसार माध्यमांची मुस्कटदाबी केली. आता फक्त त्यांच्या गोडव्यांच्या बातम्या दाखवल्या जातात, अशीही टीका राज ठाकरेंनी नाशिकच्या सभेत केली. सगळी खोटी आश्वासनं देणाऱ्या आणि खोटं बोलणाऱ्या मोदींना कोणत्या निकषांवर मतं द्यायची? असा प्रश्न राज ठाकरेंनी पुन्हा एकदा विचारला.