राज्यात अवकळी पावसाने उडाली तारांबळ; रब्बी चं पिक धोक्यात
पुणे, दि. ७: राज्याच्या अनेक भागात आज अवकाळी पावसानं हजेरी लावली.सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं. दिवसभरात सोलापूर शहर आणि जिल्ह्यातल्या तापमानात आज कमालीची घट झाली. गेल्या चार-पाच दिवसापासून सातत्यानं वाढत चाललेला तपमानाचा पारा चाळीस अंशावरून थेट २८ अंशापर्यंत घसरला होता. या वातावरणाचा विपरीत परिणाम शहर जिल्ह्यातील फळबागांवर होण्याची तसंच रब्बीची काही पिकं धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात बार्शी, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर शहर मोहोळसह अनेक तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याची नोंद आहे. हे वातावरण दोन दिवस असंच राहणार असल्याची शक्यताही हवामान खात्यानं वर्तवली आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.
सातारा शहर, तालुका आणि वाई तालुक्यासह जिल्ह्यच्या विविध भागात आज दुपारनंतर अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह तासभर झालेल्या पावसानं वातावरणातील उष्णता कमी होण्यास मदत झाली आहे. गेल्या ३ दिवसांपासून हा अवकाळी पाऊस हुलकावणी देत होता. वाशिम जिल्ह्यात कारंजा शहर आणि तालुक्यांतल्या गावांमध्ये आज विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळला यामुळे बिजवाई कांदा, भाजीपाला तसेच फळबागांचं नुकसान झालं आहे.
बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज दुपारी दोनच्या सुमाराला अचानक आलेल्या अवकाळी पावसासह मोठ्या प्रमाणावर गारपीट होऊन अनेक भागांमध्ये वीज कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. वीज पडून एका गावात आठ शेळ्यांचा मृत्यू झाला असून अनेक वृक्षही जळाले आहेत शेतातल्या भाजीपाल्यासह इतर पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अकोल्यातही सकाळी पावसाच्या हलक्या सरी येऊन गेल्या तर दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाच्या हजेरीमुळे वातावरणात गारवा पसरला आहे.