…. हेच ते हुरहूर लावणारं सुषमा स्वराज यांनी पंतप्रधानांना केलेलं शेवटचं ट्विट
नवी दिल्ली: भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्या सुषमा स्वराज यांचे मंगळवार दि. ६ रोजी वयाच्या ६७व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. सुषमा स्वराज यांच्या परिवारात पती राजकौशल आणि मुलगी आहेत.
मंगळवारी संध्याकाळी केंद्र सरकारला ट्विट करत कलम ३७० हटवल्याबाबत शुभेच्छा दिल्या. त्या आल्या ट्विट मध्ये म्हणाल्या की, “प्रधानमंत्री आपलं हार्दिक अभिनंदन. मी माझ्या जीवनात हा दिवस पाहण्याची वाट पाहत होते.” त्यानंतर काही तासात त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला व त्या बेशुद्ध पडल्या. रात्री उशिरा १०.१५ वाजता त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सुषमा स्वराज यांनी आपल्या तब्बेतीच्या कारणामुळेच २०१९ ची लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्यावर २०१६ सालच्या एप्रिल महिन्यात यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
सुषमा स्वराज यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींनी जड अंतःकरणाने ट्विट करत म्हटले की, “भारतीय राजकारणाच्या एका स्वर्णयुगाचा अंत झाला आहे. पूर्ण भारत या प्रतिभाशाली नेत्याच्या निधनामुळे शोकमग्न झाला आहे. एनडीए सरकारमधील सर्वश्रेष्ठ कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांपैकी सुषमा स्वराज या एक मंत्री होत्या. सुषमा जी या उत्तम वक्ता आणि असाधारण संसदपटू होत्या.”