सांगलीतील पुरग्रस्तांसाठी धावून आली साताऱ्यातील “दुर्गा खानावळ”
सातारा: सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला पुराने घेरलं असताना इथल्या पूरग्रस्तांच्या मदतीलाही शेकडो दानशूर हात पुढे येत आहेत. त्यातलंच एक नाव म्हणजे वठार स्टेशन तालुका सातारा येथील दुर्गा खानावळ. या खानावळीच्या सौ. शैलजा पाटील गेल्या चार दिवसांपासून सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांमध्ये जेवणाची मोफत पाकीट वाटता आहेत. सांगली जिल्ह्यातील विविध पूरग्रस्त गावातील रोज जवळपास पाच हजार लोकांना स्वयंसेवकां मार्फत ही जेवणाची पाकिटे पोहोचवली जात आहेत.
२२ मे १९३४ रोजी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात सातारा-लोणंद रोडवर वाठार स्टेशन येथे सोनुबाई जाधव यांनी ८६ वर्षांपुर्वी दुर्गा खानावळीची मुहूर्तमेढ रोवली. इथे फक्त शुद्ध शाकाहारी जेवण मिळते. गेल्या चार पिढ्या या व्यवसायाच्या माध्यमातून समाजसेवेचे व्रतही दुर्गा खानावळीच्या सर्व सदस्यांनी जोपासले आहे. सध्या दुर्गा खानावळीची सर्व टीम पुरग्रस्तांसाठी दिवसरात्र जेवण बनवण्यात व्यग्र आहे.