पान खाये सैय्या हमार..! विड्याचे पान खाण्याचे आयुर्वेदानुसार होणारे फायदे वाचा
आयुर्वेद कुतूहल तांबुल सेवन (पान खाणे)
लहानपणी आपण पाहिले असेल तर आपल्या आजी आजोबा यांकडे सतत पानाची पिशवी असायची व ते सतत पान खायचे, पूजेच्या वेळी सुद्धा अथवा मंदिरामध्ये हि देवाला नैवेद्य अर्पण केल्यावर विडा दाखवण्याची प्रथा आहे. असं काय महत्व आहे ह्या पानाचे? आज आपण ह्याच पाना विषयी व त्याच्या भक्षण करण्याच्या पद्धती विषयी आयुर्वेदाचे मत पाहूया.
आयुर्वेदात ह्या वैद्याच्याच पानाला तांबुल पत्र असे म्हणतात. आणि त्याच्या सेवन विधीला तांबुल सेवन असे म्हणतात. आजकाल मिळणाऱ्या बनारसी पनासारखे हे पान गडद हिरव्या रंगाचे नसते, ह्याला पोपटी रंग असतो थोडे पातळ आणि चवीला तिखट, तुरट लागते असेच पान आयुर्वेदात तांबुल सेवनास घेतात.
आयुर्वेदोक्त तांबुल निर्माण –
१ सुश्रुतांनुसार विड्याची दोन पाने व त्यासोबत कापूर, जायफळ, कंकोळ, लवंग, कुटकी आणि सुपारी ह्यांचे चूर्ण करून पानात घेऊन सेवन करावे.
२ चरकांनी ह्यात वेलची चाहि वापर करण्यास सांगितले आहे.
३ वाग्भटांनी मात्र दोन पानांसोबत सुपारी, चुना आणि कात ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.
ह्यामुळेच सुश्रुत व चरक आचार्यानी सांगितलेले चूर्ण, चुना आणि कात असा विडा तयार केल्यास तो परिपूर्ण विडा असेल.
विडा सेवनाचे गुण – मुख शुद्धी होते, मुखाचा दुर्गंध नष्ट होतो, हनुवटी,दात,कंठ, जीभ इ इंद्रियांचे शोधन होते, तोंडातील अधिक लाळ कमी होते, कफाचे कंठ रोग दुर होतात, हृदयास हितकर.
तांबुल सेवन काळ – तांबुल सेवन हा आयुर्वेदाच्या दिनचर्येचा भाग आहे आणि ह्याचे विशिष्ट काळ आहेत.
१ उठल्यावर – मुख शुद्धीसाठी
२ स्नाना नंतर – कफ नाशनार्थ
३ जेवणानंतर – पचनासाठी
४ उलटी झाल्यावर – मुख दौर्गंधी नाशासाठी
तांबुल सेवन निषिद्ध –
१. ज्यांना रक्त पित्त म्हणजे रक्त विकार झाले असतील, ज्यांच्या मुख, नाक, मल व मूत्र मार्गातून रक्त येत असेल अशा व्यक्तीनी विडा खाऊ नये.
२. जे जन्मतः अथवा आजार पणामुळे क्षीण व दुर्बल झाले आहेत, ज्यांचे तोंड सतत कोरडे पडते आणि ज्यांना सतत तहान लागते अशा व्यक्तीनी तांबुल सेवन करू नये.
३. जे स्वतः प्रकृती ने रुक्ष आहेत, ज्यांना क्षय (T. B.) रोग झाला आहे, तसेच पक्षाघात म्हणजे Paralysis, तोंडाचा पक्षाघात अशा लोकांनी तांबुल सेवन करू नये.
तांबुल सेवन हे शरीरातील अनावश्यक कफ कमी करण्यासाठी, रक्तप्रवाह व हृदयाला उत्तेजना देण्यासाठी तसेच पाचन सुधारण्यासाठी करावे. ह्याचा अतिरेकही करू नये, म्हणूनच जेवणानंतर चा काळ अधिक योग्य वाटतो. ह्यात सर्व कार्य साध्य होते. वाग्भटांनी पानास चुना लावण्यास सांगितलं आहे त्यामुळे शरीरातील कॅल्शियम ची कमतरता नैसर्गिक रित्या भरून येते. विडा हा औषधी आहे त्यात तंबाखू सारख्या गोष्टी टाकून त्याचे व्यसनात रूपांतर करू नये. बाहेर मिळणारे मिठा पान हे फक्त जिभेच्या चवीपुरताच त्याचा औषधी उपयोग काही नाही. अशावेळी योग्य विड्याची पाने आणि त्यातील घटकांची निवड करावी तर त्याचा उपयोग होईल.
असा हा बहुगुणी विडा तुम्हाला अर्पण करून लेख इथेच संपवतो. भेटूया पुढल्या लेखात नवीन विषय घेऊन, तोपर्यंत
आयुष्य जगा आयुर्वेदा संगे ।।
लेख आवडला असल्यास शेअर करा । LIKE करा । कंमेंट करा
वैद्य शार्दुल चव्हाण
एम. डी. आयुर्वेद
9987925720
जगदंब The Ayurvedic World ,
Ayurvedic Clinic and Panchkarma Center
फोटो सौजन्य : sukhadia.com and Plantogram
(Disclaimer: सदर लेखातील मते हि लेखक/लेखिकेची स्वतःची मते आहेत. न्युज पोर्टल फक्त एक माध्यम आहे.)