“…… त्यादिवशी शिवसेनेचा आणि माझा विषय संपेल”; वाचा नेमकं काय म्हणाले निलेेश राणे
मुंबई: काल नितेश राणे यांच्या “आदित्य ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करायचं आहे” या एका वक्तव्यावर व्यक्त होताना नारायण राणे यांचे ज्येष्ठ पुत्र माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटर द्वारे व्यक्त होत आपली नाराजी जाहीर केली होती. यानंतर निलेश राणे नाराज असल्याची चर्चा दिवसभर रंगली होती. पण आज यावर स्पष्टीकरण देत याचे सारे खापर त्यांनी माध्यमांवर फोडले आहे.
काय म्हणाले होते निलेश राणे
“नितेशच्या ह्या विषयाशी मी जराही सहमत नाही. ज्या पक्षाने राणे साहेबांना त्रास दिला, माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी सेनेशी दोन हात केले, केसेस घेतल्या, संघर्ष केला त्यांना हे कधीच सहन होणार नाही. राजकारण आपल्या ठिकाणी पण वार मी समोरूनच करणार”.
काल केलेल्या या ट्विटवर आज निलेश राणे स्पष्टीकरण देताना ट्विटर द्वारे म्हणाले की, “कालच्या माझ्या ट्विटचा मीडियाने गैर अर्थ काढला असून नितेशची साथ मी मरेपर्यंत सोडणार नाही. नितेश ने मला जे अधिकार दिले त्यातून मी त्याला समजावले.” पुढे शिवसेनेबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले की, “ज्या दिवशी शिवसेना राणे साहेबांची बदनामी आणि त्रास देणे थांबवेल त्यादिवशी शिवसेनेचा आणि माझा विषय संपेल.”
नितेश राणे कणकवली विधानसभा क्षेत्रातून भाजपतर्फे निवडणूक लढत असून. शिवसेनेकडून सतीश सावंत यांनी अधिकृतरित्या पक्षाचा एबी फॉर्म भरत युतीत बंडखोरी केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात या दोन उमेदवारांमध्ये थेट लढत पाहायला मिळत आहे.