कोकणात शिवसेनेचा उमेदवार निवडून येणं संशयास्पद आहे : नारायण राणे
सिंधुदुर्ग: कोकणात रायगड चा अपवाद वगळता सर्व ठिकाणी युतीचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आले. विशेष म्हणजे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या निलेश राणे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. गेल्या वेळेपेक्षा या वेळी मताधिक्यात वाढ झालेली आहे.
लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर काल दि. २५ मे रोजी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन निकलांवर शंका उपस्थित केली आहे. आम्ही तळकोकणात हरलो असलो तरीही आम्हाला पराभव मान्य नसल्याचे म्हणत ते पुढे म्हणाले की कोकणात शिवसेनेचा उमेदवार निवडून येणं संशयास्पद आहे.
सलग दोन निवडणुकांमध्ये झालेला पराभव नारायण राणे यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. स्वतः महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष NDA चा घटकपक्ष असल्याचे मानले जाते. निकालाच्या दिवशी हेराफेरी झाल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला आहे. कणकवलीत आमच्या उमेदवाराच्याच मतदारसंघात आम्हाला लीड कसा काय नव्हता? रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात सर्व फेऱ्यांमध्ये ७-८ हजार मतांचा फरक कसा काय दाखवला जात होता? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
या पार्श्वभूमीवर आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याबाबत विचार करत असल्याचेही ते पुढे म्हणाले.