अखेर नाणार प्रकल्प पूर्णपणे रद्द : उद्योगमंत्री सुभाष देसाई
कोकणात होणारा नाणार रिफायनरी प्रकल्प अखेर रद्द करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी वापर करण्यात आलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत करण्यात येणार आहेत. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
तसेच ज्या गावाला हा प्रकल्प व्हावा असे वाटते, त्या गावात तो सुरू करण्यात येईल, असेही देसाई यांनी सांगितले. हा प्रकल्प रद्द व्हावा यासाठी शिवसेनेने भाजपवर दबाव आणला होता.
कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात होणाऱ्या नाणार रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा मोठा विरोध होता. ‘नाणार रद्द होणार’ अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाम भूमिका घेत युतीच्या वेळी नाणार प्रकल्प रद्द करण्याची अट प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांसमोर ठेवली होती. अखेर शनिवारी यावर शिक्कामोर्तब झाल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.
नाणार प्रकल्प अखेर रद्द करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत करण्यात येणार आहेत, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. नाणार प्रकल्पासाठी निघालेली भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले. नाणार प्रकल्प रद्द झाला असला तरी जिथे स्वागत होईल तिथे हा प्रकल्प होऊ शकतो असेही ते म्हणाले.