मुंबईसह राज्यात पावसाचे दमदार पुनरागमन
मुंबई, दि. ८: राज्यात अनेक भागांत पावसाने पुनरागमन केलं आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई, नाशिक, धुळे, अहमदनगर याभागात पावसानं हजेरी लावली. नाशिक जिल्ह्यात कालपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. रात्रीपासून जिल्ह्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस सुरु असून दिंडोरी तालुक्यात एक जुनं घर कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जण दगावले आहेत. आज सकाळपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात २५ पूर्णांक ८ दशांश मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सोलापूर शहरातल्या अनेक भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला तर ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी या पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यातली खरीपाची पिकं वाया गेली असल्यानं या पावसानं कोणताही दिलासा शेतकऱ्यांना मिळालेला नाही. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात आज सकाळपासून संततधार सुरू आहे. मागच्या चोवीस तासात जिल्ह्यात २६ पूर्णांक १० शतांश मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस खरीपातल्या पिकांना जीवनदान देणारा ठरला आहे. जालना जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ५५ पूर्णांक ६५ शतांश मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
Source – AIR