मराठा आरक्षणा विरोधात ऍड. गुणरत्ने यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
नवी दिल्ली: मराठा आरक्षण प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आलेल्या एका याचिकेवर आज सुनावणी होती. या प्रकरणी न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती न देता राज्य सरकारला पुढील दोन आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.
उच्च न्यायालयात मराठा आरक्षणची याचिका निकाली निघाल्यावर आता मराठा आरक्षण विरोधी सामाजिक संघटना व डॉ. जयश्री पाटील यांच्यावतीने ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकाकर्त्यांची मागणी आहे की राज्य सरकारने राजकीय फायद्यासाठी नियमाला बगल देऊन दिलेलं ‘एसईबीसी’ प्रवर्गातलं आरक्षण रद्द करावं. सदर आरक्षण हे संविधानपीठाने निर्धारित केलेल्या ५० टक्के मर्यादेचं उल्लंघन असल्याचं याचिकेत नमूद करण्यात आलं आहे.
या याचिकेवर सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी करण्यात आली.