जून महिन्यातील ‘निसर्ग’ वादळानंतर सेफ्टी ऑडिट झालं का नाही?
जेएनपीटी, नवी मुंबई दि.६: काल झालेल्या वादळी पावसात नवी मुंबई, न्हावा-शेवा येथील जे.एन.पी.टी. (जवाहरलाल नेहरू पत्तन न्यास) बंदरावरील क्यूसी ६,७ व ८ या तीन क्रेन वादळाच्या ताडाख्यामुळे एकाएकी कोसळल्या. यावेळी कोणतीच जीवितहानी झाली नाही. जवळपास ११० कोटी रुपयांच मूल्य असलेल्या या क्रेन कोसळल्यामुळे मोठा आर्थिक भुर्दंड बसलाच आहे पण बंदरावरील मालाच्या आवक-जावक वर याचा पुढील काही काळ नक्कीच परिणाम होणार आहे. या बंदरावर महिन्याला लाखो कंटेनर मार्फत मालाची आयात-निर्यात होते. ज्यात तेल, खनिजं, विविध उद्योगांना लागणारा कच्चा माल, अन्नधान्य, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, फळे, मासे, मांस, इलेक्ट्रॉनिक यंत्रे, संगणक या व अशा अनेक मालाची आयात-निर्यात होते.
कालच्या दुर्घटनेमुळे या सर्व मालाच्या व्यापारावर मोठा परिणाम होऊ शकतो. मुळात कालच्या वादळी वाऱ्यांपूर्वी जुन महिन्यात आलेल्या ‘निसर्ग’ वादळानंतर ‘जेएनपीटी’ बंदरावरील क्रेन, इमारती, टॉवर्स यांचं स्ट्रक्चरल ऑडिट व संबंध ‘जेएनपीटी’ बंदराचं सेफ्टी ऑडिट होणं गरजेचं होतं. पण ते झालेलं दिसत नाहीये. सर्व मोठ्या कंपन्या/आस्थापनांमध्ये ‘प्लांट हेल्थ सेफ्टी’ नावाचा एक विभाग कार्यरत असतो. ज्याचे काम ते-ते कारखाने व त्यांच्या स्थायी यंत्रणा यांच्या बांधकामाचा दर्जा वेळोवेळी तपासणे, कमकुवत झालेल्या ढाच्यामुळे होऊ शकणाऱ्या दुर्घटनांबाबत पूर्वानुमान करणे असे असते. याच सोबत भूकंप, पूर, वादळं, अतिवृष्टी अशा नैसर्गिक अपत्तींनंतर अस्थापनांतील बांधकामाचा तसेच यंत्रणेचा दर्जा तपासणे हेही काम याच विभागाकडे असते.
जुन महिन्यात आलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळानंतर नक्कीच समुद्राच्या मुखावर वसलेल्या जेएनपीटी बंदरावरील बांधकामावर विशेषतः क्रेनवर गंभीर परिणाम झाला असणार. परंतू काल झालेल्या दुर्घटनेकडे पाहिल्यावर जाणवते की जेएनपीटी प्रशासनाने या बाबीकडे नक्कीच अक्षम्य दुर्लक्ष केलेलं दिसतंय. या प्रकरणी प्रशासन भलेही सर्व दोष वादळी वाऱ्यांवर ढकलत असलं तरी यात मोठे दोषी हे यंत्रणेतील अधिकारी तसेच कंत्राटदार आहेत असे म्हणणे अतिशयोक्तीपूर्ण ठरणार नाही. या तीन क्रेन तुटून ११० कोटींच नुकसान झालं ही बाब तेवढी महत्वाची नसून या घटनेमुळे व्यापारावर ताण पडून झालेले व होणारे मोठे आर्थिक नुकसान ही मोठी मेख आहे. दरम्यानच्या काळात या बंदरावरील व्यापार दुसऱ्या राज्यांतील बंदरांकडे वळता झाला तर त्याचा या परिसरातील छोट्या-मोठ्या उद्योगांवर व त्यायोगे महाराष्ट्राच्या महसूलावरही वाईट परिणाम होणार आहे. शिवाय जेएनपीटी सारख्या एका प्रमुख बंदरावरील क्रेन पडणे भारतासारख्या आंतरराष्ट्रीय व्यापारात महत्वाचे स्थान असलेल्या देशासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे.
या संपूर्ण प्रकरणी जेएनपीटी चे अध्यक्ष संजय सेठी काय भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. याच सोबत या खात्याचे केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनीही या प्रकरणी लक्ष घालणे गरजेचे आहे.