मुंबईत उष्णतेची लाट; कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस वर
मुंबईसह कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला आठवडाभर थोडा दिलासा मिळाल्यानंतर आता पुन्हा एकदा तापमानाचा पारा चढायला सुरुवात झाली आहे. मुंबईच्या कमाल तापमानातही चढ-उतार नोंदविण्यात येत असून, वाढता उकाडा यात भर घालत आहे. हवामानात सातात्याने बदल नोंदविण्यात येत असतानाच हवामान खात्याने पुन्हा विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तसेच मुंबईचे कमाल तापमानही ३५ अंश सेल्सिअसवर पोहोचेल, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मुंबईत मंगळवारी कुलाबा येथे कमाल तापमान ३४ तर सांताक्रूझ येथे ३४.१० अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. पुणे, जळगाव, परभणी तसेच विदर्भात अनेक ठिकाणी मंगळवारचे तापमान सोमवारपेक्षा एक ते दोन अंशांनी अधिक नोंदले गेले. सर्वाधिक कमाल तापमान ब्रह्मपुरी येथे ४५.१ अंश सेल्सिअस होते.
२७ ते २९ एप्रिल दरम्यान पारा आणखी चढून ३६ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात हवामान कोरडे असल्याने उन्हाचे थेट चटके जाणवत आहेत. मे महिन्यातही मुंबईकरांना ऋतुमानानुसार उन्हाचा आणि वाढत्या आर्द्रतेचा सामना करावा लागणार आहे.