चाणजे ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी
उरण, दि.९(विठ्ठल ममताबादे): गेल्या अनेक वर्षांपासून ग्रुप ग्रामपंचायत चाणजेच्या भ्रष्टाचार कारभाराची चौकशी सुरू आहे. तसेच काही विद्यमान सदस्यांवर कारवाईचे पत्र येऊनही त्यांच्यावर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने चाणजे ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचार दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे अशा ग्रामपंचायतची चौकशी करून भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या विद्यमान ग्रामसेवक पालकर व त्यांना साथ देणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांवर कारवाई करून ग्रामसेवकाची तडकाफडकी बदली करण्यात यावी अशा प्रकारची मागणी उरण मधील सामाजिक कार्यकर्ते सचिन रमेश डाऊर यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे केली आहे.
चाणजे ग्रामपंचायत मध्ये अनेक वर्षांपासून भ्रष्टाचार चालू आहे. त्यातच नव्याने रुजू झालेले ग्रामसेवक पालकर यांनी त्यात आणखीनच भर घातली आहे. पालकर यांना काही विचारले असता ते उडवीची उत्तरे देत असून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत आहेत. पालकर यांनी ज्या ज्या ठिकाणी ग्रामसेवक म्हणून काम केले त्या त्या ठिकाणी भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आणि पालकर यांना ग्रामपंचायत सदस्य पाठिंबा देत आहेत. त्यामुळे पालकर यांची बदली करून त्या ठिकाणी पूर्वी असलेली वैभव पाटील यांचे निवड करावी. तसेच ग्रामसेवकाचे मुख्यालय चाणजे ग्रामपंचायत मध्ये ठेवण्यात यावे जेणेकरून भ्रष्टाचाराला आळा बसेल. असे सचिन डाऊर यांनी आपल्या निवेदनपर पत्रात नमूद केले आहे.
कोट
चाणजे ग्रामपंचायत मध्ये दररोज प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार होत असून त्याबद्दल अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत.मात्र जिल्हा परिषद पासून ते पंचायत समिती पर्यंत कोणत्याही अधिकाऱ्यांनी यावर ऍकशन घेतले नाही.प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार चालू असून जर त्यांच्यावर कारवाई होत नसेल तर न्याय कोणाकडे मागावा ? वर्षानुवर्षे चाणजे ग्रामपंचायत मध्ये चाललेला भ्रष्टाचार थांबेल तरी कधी ? भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई होईल तरी कधी ? असा सवाल जनतेतून उपस्थित केला जात असून कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई होत नसल्याने जनतेतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.म्हणून भ्रष्ट ग्रामपंचायत व ग्रामसेवकावर कारवाई झालीच पाहिजे यासाठी मी पत्रव्यवहार केला आहे.
– सचिन डाऊर,
सामाजिक कार्यकर्ते
करंजा-उरण