“जे औरंगजेबाला जमलं नाही ते महाराष्ट्र सरकारनं करून दाखवलं”; गडकिल्यांच्या हॉटेल वापरासंबंधी निर्णयावर खा. अमोल कोल्हे यांचा संताप
मुंबई: इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार राज्य सरकार एमटीडीसी च्या वतीने राज्यातील जवळपास २५ किल्ले हॉटेलिंग, लग्न समारंभ यासाठी भाडेतत्वावर देणार असल्याचे कळते. राजस्थानच्या धर्तीवर हेरिटेज टुरिझम ज्यात गडकिल्ले, ऐतिहासिक वास्तू यांचा समावेश होतो, खाजगी पर्यटन क्षेत्रातील मोठ्या आस्थापनांना ६०-९० वर्षांच्या भाडेतत्वावर दिले जाणार आहेत. ३ सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळ बैठकीत यावर निर्णय घेण्यात आला.
ही बातमी बाहेर पडताच सोशल मीडिया वर गडकिल्ले प्रेमींमध्ये फार मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळली. या निर्णयाचा राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र शब्दात निषेध केला. या सर्व प्रकरणावर ट्विटर द्वारे आपल्या संतापला वाट मोकळी करत खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, “जे औरंगजेबाला जमलं नाही ते महाराष्ट्र सरकारनं करून दाखवलं! केवळ संतापजनक! विकास हवा पण गडकोटांचं पावित्र्य राखूनच!” राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही गडकिल्यांसंबंधीच्या या निर्णयाला ठाम विरोध केला आहे.