Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 9372236332 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 9372236332

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आगामी १०० दिवसातील कामांच्या आराखड्याचा आढावा

“शक्तिपीठ महामार्गाचे काम सुरु करावे” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १३ : राज्यातील दळणवळण सुविधा तसेच व्यावसायिक संधी आणि पर्यटनाला गती देणाऱ्या शासनाच्या महत्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्गाच्या कामाचे नियोजन सर्वांना विश्वासात घेऊन तत्परतेने सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे आगामी शंभर दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागाने करावयाच्या कामकाजाचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मेघना साकोरे बोर्डीकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, सचिव सदाशिव साळुंखे (रस्ते), सचिव संजय दशपुते (बांधकामे), महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी  राज्यातील महामार्गाची उभारणी आणि रस्त्यांचे जाळे दर्जेदार आणि अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने नियोजन करण्याचे सूचित करुन सांगितले की, राज्यातील धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या आणि पर्यटन उद्योगाला प्रोत्साहन देणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाची उभारणी दर्जेदार आणि गतिमानतेने करावयची असून सर्वांना विश्वासात घेऊन त्यासाठीची प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

समृद्धी महामार्गाचे उर्वरित अंतिम  टप्प्याचे आमणेपर्यंतचे ७६ कि.मी. काम तत्परतेने पूर्ण करुन फेब्रुवारीपर्यंत हा महामार्ग पूर्णपणे खुला करावा. तसेच यावर्षी समृद्धी महामार्गाचे कर्जरोखे प्रक्रिया पूर्ण करण्यात  यावी. प्रवाशांना उपयुक्त ठरणाऱ्या मुंबई-पुणे द्रुतगती  मार्गावरील १३.३० कि.मी. मिसिंग लिंकचे कामही गतीने पूर्णत्वास न्यावे. नाशिक- मुंबई या राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करण्याचे काम ही तातडीने  पूर्ण करावे. मंत्रालय परिसरात नवीन सात मजली इमारतीची उभारणी कामाची सुरुवात करण्यात यावी.

सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत कामांची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी संबंधितांकडून योग्यरित्या पार पाडली जाणे आवश्यक असून त्याचे नियंत्रण करणारी यंत्रणा विभागाने कार्यान्वित करावी.  विभागाच्या आर्थिक सक्षमतेसाठी नियोजन विभागाच्या निर्देशानुसार आर्थिक प्रारुप तयार करावे. रस्त्यांच्या निर्मितीसाठी भूसंपादन प्रक्रिया शासनाने करुन रस्त्याचे काम  बीओटी तत्वावर करण्याचे धोरण स्वीकारावे.  विविध विभागांच्या बांधकामांसंदर्भात केंद्रीय कार्यपद्धती अंमलात आणणे गरजेचे आहे. त्यासाठी बांधकाम विभागातच संबंधित विभागांच्या  बांधकामासाठीचा  स्वतंत्र  कक्ष तयार करण्यात येईल. रस्त्यांच्या दुर्तफा  वृक्ष लागवड  करताना भविष्यातील रस्ता विस्तारीकरणाची निकड लक्षात घेऊन वृक्षसंगोपन करणात  यावे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन दर्जेदार आणि गतिमान कामे करण्याच्या  दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विभागामार्फत गुणवत्तापूर्ण आणि गतिमानतेने काम करण्यास प्राधान्य देण्यात येणार असून विभागाच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणि कालमर्यादा प्रामुख्याने पाळण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच महामार्गावर प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध असण्यावर, प्राधान्याने महिला प्रवाशांसाठी प्रसाधनगृहांची सुविधा उपलब्ध करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले.

विभागाच्या अपर मुख्य सचिव म्हैसकर यांनी विभागाच्या आगामी शंभर दिवसांच्या नियोजनाबाबत माहिती देताना कार्यक्षमता, गुणवत्ता, पारदर्शकता याला प्राधान्य देत विभागाच्या माध्यमातून येत्या शंभर दिवसांत विविधांगी महत्त्व पूर्ण प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात येणार असून  विभागाच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने राबवण्यात येणा-या कामांची सविस्तर माहिती दिली.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *