सायबर फसवणूक करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी दूरसंचार विभाग, गृह मंत्रालय आणि राज्य पोलिसांचे परस्पर सहकार्य
संबंधित २० लाख मोबाइल कनेक्शनची पुनर्पडताळणी करण्याचे निर्देश केले जारी
नवी दिल्ली/मुंबई, दि. १०: दूरसंचार विभाग, गृह मंत्रालय आणि राज्य पोलीस, सायबर-गुन्हे तसेच आर्थिक फसवणुकीमध्ये दूरसंचार संसाधनांचा गैरवापर रोखण्यासाठी एकत्र आले आहेत. फसवणूक करणाऱ्यांचे जाळे नष्ट करणे आणि डिजिटल धोक्यांपासून नागरिकांचे संरक्षण करणे हा या सहयोगी प्रयत्नाचा मुख्य उद्देश आहे.
गृह मंत्रालय आणि राज्य पोलिसांनी केलेल्या विश्लेषणात सायबर गुन्ह्यांमध्ये २८,२०० मोबाईल हँडसेटचा गैरवापर करण्यात आल्याचे आढळून आले आहे. दूरसंचार विभागाने यापुढे जाऊन केलेल्या विश्लेषणात या मोबाइल हँडसेटमध्ये तब्बल २० लाख दूरध्वनी क्रमांक वापरले गेले असल्याचे आढळले आहे. या विश्लेषणानंतर, दूरसंचार विभागाने दूरसंचार सेवा प्रदात्यांना २८,२०० मोबाइल हँडसेट ब्लॉक करण्याचे आणि या मोबाइल हँडसेटशी जोडलेल्या २० लाख मोबाइल क्रमांकांची तात्काळ पुनर्पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पुनर्पडताळणी अयशस्वी ठरल्यास त्या दूरध्वनी क्रमांकांची सेवा तत्काळ खंडित करण्याचे निर्देशही दूरसंचार सेवा प्रदात्यांना दिले आहेत. हा सर्वसमावेशी दृष्टीकोन सार्वजनिक सुरक्षेसाठी तसेच सुरक्षित डिजिटल वातावरण सुनिश्चित करण्यासाठीच्या सामायिक वचनबद्धतेचे प्रदर्शन करतो.