विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा दावा
मुंबई: भारतीय जनता पक्षातर्फे आज मुंबईत पदाधिकारी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कालच्या मुलाखतीचा संदर्भ देत म्हटले की, “सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही. आम्ही कोरोनाची लढाई लढणार आहोत. पण रोज ओरडता काय, किमान सरकार चालवून तर दाखवा. तीन चाकी ऑटोरिक्षा कुठे न्यायची, हे चालक नाही, त्यात बसलेली सवारी ठरविते.”
कोरोना चाचण्यांबाबत फडणवीस म्हणाले की, “कोरोनाच्या चाचणीत महाराष्ट्र देशात १९ व्या क्रमांकावर. मुंबईत तर चाचण्या फारच कमी केल्या जातात. त्यामुळे मृत्युदर वाढतो आहे. एक महिना मोठ्या प्रमाणात चाचण्या केल्या, तर मुंबईत परिवर्तन झालेले दिसेल.”
राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत ते म्हणाले की, “शेतकरी त्रस्त आहे. शेतमालाची खरेदी नाही. केंद्र सरकारने पैसा दिला. पण राज्य सरकारने पुढाकारच घेतला नाही. आज दूध उत्पादक संकटात आहे. आमच्या सरकारच्या काळात किमान १००० कोटी रुपये दूध उत्पादकांना दिले.” पुढे युरियाच्या होणाऱ्या काळ्या बाजाराबाबत ते म्हणाले की, “राज्य सरकारने ज्यांची दूध खरेदी केली, त्यांची नावं एकदा जाहीर करा. युरियाचा आज सर्रास काळाबाजार होतो आहे. सरकारी बियाणंच नकली निघणार असेल, तर शेतकऱ्यांनी बघावं तरी कुणाकडे.”
आजच्या पदाधिकारी बैठकीला विनोद तावडे हे व्यासपीठावर उपस्थित होते हे विशेष.