रामदास आठवलेंना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोबत नसल्याची खंत वाटतेय; वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना व्यक्त केली खंत
मुंबई: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही इतर नेत्यांप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण शुभेच्छा देताना त्यांनी एक खंतही व्यक्त केली.
ट्विटर द्वारे मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देताना जुन्या आठवणींना उजाळा देत ते म्हणाले की, “शिवशक्ती भीमशक्तीच्या प्रयोगाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यात योगदान दिले. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. ते आज आमच्या सोबत असायला हवे होते याची खंत वाटत आहे.” दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत शिवशक्ती-भीमशक्ती च्या सोशल इंजिनीअरिंग साठी सर्वात आधी शिवसेनेने आवाज दिला. त्याला रामदास आठवले यांनी साथ दिली. पुढे शिवसेना-भाजप मध्ये वितुष्ट आल्यावर आठवलेंनी सेनेची साथ सोडत भाजपशी युती कायम ठेवली. पण महायुतीत शिवसेना नसल्याची खंत रामदास आठवलेंना सदैव बोचतेय हे या ट्विटमुळे प्रकर्षाने जाणवतंय.
शिवशक्ती भीमशक्तीच्या प्रयोगाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यात योगदान दिले.आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.ते आज आमच्या सोबत असायला हवे होते याची खंत वाटत आहे@uddhavthackeray
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) July 27, 2020