Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“पण त्यांच्या प्रामाणिकपणावर व संवेदनशीलतेवर शंका घ्यायला जागा नाही”

ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

“त्यांच्या अनेक निर्णय व कृतींबद्दल चर्चा होऊ शकते. पण त्यांच्या प्रामाणिकपणावर व संवेदनशीलतेवर शंका घ्यायला जागा नाही.” असे म्हणत ज्येष्ठ पत्रकार व माजी राज्यसभा सदस्य भारतकुमार राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फेसबुक पोस्ट लिहीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज वयाची साठी पूर्ण करत आहेत. यानिमित्ताने पत्रकारितेतील भारतकुमार राऊत यांच्यासारख्या अनेक दिग्गजांनीही त्यांची तोंडभरून स्तुती केली आहे.

वाचा नेमकं काय म्हणाले आहेत ते

आशास्थान !

संत तुकाराम म्हणतात :

पुत्र व्हावा ऐसा गुंडा
ज्याचा तिन्ही लोकी झेंडा

यांतील ‘गुंडा’ या शब्दाचा अर्थ ‘पराक्रमी’ असा आहे, हे ध्यानात घेतले तर हे वर्णन शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लागू पडते. राजकारण, समाजकारण, पत्रकारिता, फोटोग्राफी, मानवता अशा विविधांगी आघाड्यांवर कर्तबगारी गाजवणाऱ्या उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस! त्यांना महाराष्ट्राच्या तमाम जनतेतर्फे शुभेच्छा!

उद्धव ठाकरेंना समाज प्रबोधन, राजकारण व कलेचा वारसा आजोबा प्रबोधनकार व वडिल बाळासाहेब यांच्याकडून मिळाला. पण केवळ वारशाच्या शिदोरीवर न जगता उद्धवजींनी स्वत:च्या वाटाही चोखाळल्या व स्वत:ला उत्तुंग यश मिळविताना ठाकरे घराण्याची परंपराही अधिक समृद्ध केली.

मा. बाळासाहेबांच्या निधनानंतर आता शिवसेना संपली, असे मनाचे इमले बांधणाऱ्यांचे चेहरे रंगवण्याचे काम त्यांनी लीलया केले. शिवसेना ५४ वर्षे पूर्ण केल्यानंतर पक्षाचे १८ खासदार संसदेत आहेत व महाराष्ट्रात शिवसेना सत्तेतील सर्वात मोठी भागीदार आहे, हे वास्तव पुरेसे बोलके आहे.

कमालीच्या हुषारीने ते राजकीय खेळी खेळतात व प्रतिपक्षाला सहजतेने चितही करतात. भले भले विश्लेषक त्यामुळे बुचकळ्यात पडतात.

उद्धव ठाकरे साहसी पत्रकार व निर्भिड संपादक तर होतेच शिवाय कला, निसर्ग व वन्य जीवन यांची उत्तम जाण असलेले छायाचित्रकारही आहेत.

त्यांना जंगलातील वाघांची ओढ आहे, तसेच महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे प्रेम व विठ्ठलाच्या वारकऱ्यांवर श्रद्धा आहे. त्यामुळेच त्यांच्या कॅमेऱ्याने टिपलेल्या या विषयावरील फोटोंची प्रदर्शने व संग्रह खूप गाजले.

असे उद्धव ठाकरे. महाराष्ट्राचे एक आशास्थान. त्यांच्या अनेक निर्णय व कृतींबद्दल चर्चा होऊ शकते. पण त्यांच्या प्रामाणिकपणावर व संवेदनशीलतेवर शंका घ्यायला जागा नाही.

जीवेत् शरद: शतम् ।

भारतकुमार राऊत

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *