शेतकऱ्यांना जो मी शब्द दिलेला आहे, तो शब्द माझ्या आणि शेतकऱ्यांमधला आहे आणि तो मी पाळणार आहे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
नागपूर: अभूतपूर्व गोंधळानंतर आज विधिमंडळाचे कामकाज स्थगित करण्यात आले. यानंतर विधिमंडळाबाहेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विरोधीपक्षाला उद्देशून ते म्हणाले, “शेतकऱ्यांना जो मी शब्द दिलेला आहे, तो शब्द माझ्या आणि शेतकऱ्यांमधला आहे आणि तो मी पाळणार आहे पण आम्हाला तुम्ही करायला लावलं असा आव आमच्या विरोधी पक्षाने आणण्याचा प्रयत्न करू नये.”
पुढे केंद्र सरकारला संबोधून ते म्हणाले की, “केंद्राकडून राज्याकडे येणारा GST चा परतावा आहे, जवळपास १५००० कोटींची रक्कम बाकी होती. महाराष्ट्राने मागणी केल्यानंतर केंद्र आता हलायला लागले आहे, साधारणतः ४५०० कोटींचा पहिला हप्ता आलेला आहे म्हणजे केंद्राने मान्य केले की आम्ही तुम्हाला द्यायला दिरंगाई केली. “महाराष्ट्राच्या जनतेची एक अपेक्षा असते की आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी या सभागृहामध्ये जाऊन आपल्या व्यथांना, वेदनांना वाचा फोडतील, आपल्या समस्या मांडून सरकारकडून त्यावर न्याय मिळवून घेतील.”
काल दिल्लीत झालेल्या जामिया हिंसाचार प्रकरणीही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले. ये म्हणाले की, “ज्या देशांमध्ये युवक जिथे बिथरतो तो देश स्थिर राहू शकत नाही म्हणून मी केंद्र सरकारला सांगतो की तुम्ही युवकांना बिथरवू नका, युवक हे आपल्या देशाचे भावी आधारस्तंभ आहेत, शक्ति आहे.”