अणूप्रकल्पातील दूषित पाणी समुद्रात सोडण्यास चीनचा विरोध; वाचा नेमकं प्रकरण काय आहे
रत्नागिरी/चीन/जपान: २०११ साली महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर येथे अणुऊर्जा प्रकल्प होऊ नये यासाठी स्थानिकांनी आंदोलन केलं होतं. शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला होता. यावेळी त्यांनी या प्रकल्पातून सोडल्या जाऊ शकणाऱ्या दूषित पाण्यामुळे होऊ शकणाऱ्या संभाव्य धोक्यांबाबत इशारा दिला होता. याच एका मुद्द्यावर सध्या चीन आणि जपान या दोन देशांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.
वाचा नेमकं प्रकरण काय आहे
फुकुशिमा अणु प्रकल्पातून दहा लाख टनांहून अधिक इतक्या मोठ्या प्रमाणात प्रक्रिया केलेले दुषित पाणी समुद्रात सोडण्याच्या जपानच्या निर्णयाला चीननं विरोध केला आहे. हा अत्यंत चुकीचा निर्णय असून जपाननं पुढील पिढ्यांचा विचार करून जबाबदारीनं वागावं, असा सल्ला चीननं दिला आहे.
चीननं जपानच्या राजदूतांना पाचारण करत त्यांच्याकडे निषेधही नोंदवला आहे. जपानच्या या कृतीमुळं आंतरराष्ट्रीय कायद्यांचा भंग होणार असून त्याविरोधात कारवाई करण्याचा चीनला अधिकार असल्याचं इशारा यावेळी देण्यात आला.
जपानच्या फुकुशिमा अणु केंद्रात गेल्या अनेक वर्षांपासून प्रक्रिया केलेले पाणी साठवून ठेवण्यात आलं असून ते समुद्रात सोडण्याचा निर्णय जपान सरकारनं घेतला आहे. या पाण्यातून जवळपास सर्व किरणोत्सरक घटक काढून टाकले असल्यानं ते सुरक्षित असल्याचा जपानचा दावा आहे. आंतरराष्ट्रीय अणु उर्जा संस्थेनंही यास आक्षेप घेतलेला नाही.
Source – AIR