Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

जी-20 समूहाच्या आपत्ती जोखीम कमी करण्याविषयीच्या कृती गटाच्या प्रतिनिधींनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील आपत्कालीन कार्यवाही केंद्राला दिली भेट

या प्रतिनिधींनी ऐतिहासिक वारसा स्थळ असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीलाही भेट दिली

मुंबई, दि. २४: जी-20 समूहाच्या आपत्ती जोखीम कमी करण्याविषयीच्या कृती गटाच्या (डीआरआरडब्ल्यूजी) प्रतिनिधींची दुसरी बैठक आज मुंबईत सुरु होत आहे.तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीसाठी १२० हून अधिक सदस्यांचा समावेश असलेले हे प्रतिनिधीमंडळ मुंबईत आले असून आज त्यांनी वारसा स्थळ असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) मुख्यालयाच्या इमारतीला भेट दिली. यावेळी पारंपरिक महाराष्ट्रीय पद्धतीने जी-20 डीआरआरडब्ल्यूजी प्रतिनिधींचे स्वागत करण्यात आले. महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचा त्यांनी अभ्यास दौरा केला. विविध आपत्तींच्या वेळची परिस्थिती हाताळण्याबाबत महानगरपालिकेची सुसज्जता तसेच बीएमसीच्या प्रतिबंधक आणि उपशमन उपाययोजना यांची प्रतिनिधीमंडळाच्या सदस्यांनी प्रशंसा केली. तसेच १२८ वर्ष जुन्या महानगरपालिका मुख्यालय इमारतीच्या भव्य आणि नेत्रदीपक वास्तूरचनेचे देखील त्यांनी कौतुक केले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांच्यासह महानगरपालिकेचे अनेक वरिष्ठ अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

विविध प्रकारच्या आपत्तींच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी महानगरपालिकेने प्रतिबंध, उपशमन आणि सज्जता यासंदर्भात हाती घेतलेले उपक्रम, मुंबईमध्ये आतापर्यंतच्या काळात आलेल्या विविध नैसर्गिक तसेच मानव-निर्मित संकटांच्या वेळी आपत्कालीन कार्यवाही केंद्राने केलेली कामगिरी, आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे असलेली साधने, लोकसहभाग वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न, इत्यादींबाबत सादरीकरणाद्वारे जी-20 प्रतिनिधींना विस्तृत माहिती देण्यात आली.

वर्ष 1993 मध्ये झालेल्या लातूरच्या भूकंपानंतर, महाराष्ट्र राज्य सरकारने अधिसूचना जारी करून सर्व जिल्हा व्यवस्थापनांना अशा संकटांच्या वेळी संपर्क आणि समन्वय साधण्याच्या दृष्टीने नियंत्रण कक्षांची उभारणी करण्याचे निर्देश दिले होते. 1999 मध्ये बीएमसी मुख्यालयाच्या तळघरातील सुमारे 500चौरस फुटांच्या जागेत आपत्ती व्यवस्थापन पथकाची (डीएमयु) उभारणी करण्यात आली. मुंबई आणि परिसरात 26 जुलै 2005 रोजी आलेल्या प्रलयाने आपत्कालीन कार्यवाही केंद्राचे (ईओसी) महत्त्व अधिकच अधोरेखित केले. त्यानंतर एका वर्षाच्या आत, नियंत्रण कक्षाचा विस्तार करून 4000 चौरस फुटांच्या जागेत मर्यादित कर्मचारी वर्ग आणि आधुनिक साधनांसह आपत्कालीन परिस्थिती परिणामकारक पद्धतीने हाताळण्यासाठी हा कक्ष सज्ज झाला. त्यानंतर, वर्ष 2017 मध्ये आपत्ती व्यवस्थापन विभागाचा विस्तार करण्यात येऊन आता महानगरपालिका मुख्यालय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर 7000 चौरस फुटांच्या जागेत या विभागाचे कामकाज सुरु आहे.

ईओसी म्हणजेच आपत्कालीन कार्यवाही  केंद्राचे काम संपूर्ण वर्षभर अहोरात्र सुरू असते.  हे केंद्र प्रशासन पातळीवर त्याचबरोबर प्रत्यक्ष घटनास्थळी काम करणारे युनिट यांच्यावर नियंत्रण आणि आज्ञा देणारी संस्था म्हणून काम करते. आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सर्व समस्यांसाठी हा एकल-बिंदू स्रोत आहे. संकटकाळामध्‍ये  वेगवान  आणि प्रभावी प्रतिसादासाठी विविध प्रमुख भागधारकांशी समन्वय साधण्‍याचे काम ईओसी करते.  नागरिकांना संपर्क साधता यावा यासाठी इओसीला   1916 हा समर्पित मदत क्रमांक देण्यात आला असून   ईओसीला 60 समर्पित दूरसंचार लाईन ठेवल्या आहेत.  या व्यतिरिक्त नियंत्रण कक्षात ‘लँड लाईन्स’ , ‘हॉट लाईन्स’, सेल्युलर फोन, डीएमआर इत्यादी दूरसंचार साधने आणि प्रणाली  उपलब्ध आहे. ईओसीमध्‍ये हॅम (एचएएम) रेडिओ यंत्रणा सज्ज आहे. नागरी तक्रारींसह आपत्ती तसेच आणीबाणीशी संबंधित सर्व प्रकारच्या तक्रारी ईओसीकडे येतात. त्यानंतर तक्रारी संबंधित एजन्सीकडे पाठवल्या जातात आणि त्यानंतर नियमित ताज्या घडामोडीची माहिती  घेऊन नागरिकांना दिली जाते.

बीएमसी आपत्ती व्यवस्थापन विभाग ‘यूएनडीपी’ च्या सहकार्याने, बहुविध धोक्यांचा समावेश असलेली जोखीम मूल्यांकन योजना तयार करत आहे. ही योजना निर्णय  समर्थन प्रणालीसाठी ‘आर्कजीआयएस  प्लॅटफॉर्म’ वर उपलब्ध असणार आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाला त्वरित  कारवाई करता यावी, यासाठी विविध धोक्यांची पूर्वसूचना देणारी  प्रणाली  विकसित करण्याची  प्रक्रिया सुरू  आहे. नागरिकांसाठीही ती उपलब्ध करून दिली जाणार आहे. नागरिकांच्या सहभागाचे महत्त्व लक्षात घेऊन आणि समुदायाला लवचिक बनवण्यासाठी, ‘एनडीएमए ‘ने  पुढाकार घेतला आहे. यामध्‍ये  बीएमसी च्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने 1000 स्वयंसेवकांना प्रशिक्षित केले आहे.  हे प्रशिक्षणार्थी बीएमसीसाठी  ‘आपदा  मित्र’ आणि ‘सखी’ म्हणून काम करणार आहेत.

  

बीएमसीच्या नियंत्रण कक्षाला भेट दिल्यानंतर आणि बीएमसी वारसा वास्तूची  पाहणी केल्यानंतर ‘डीआरआरडब्ल्यूजी’ चे  प्रतिनिधी प्रसिद्ध  ‘गेटवे ऑफ इंडिया’ ला भेट देणार असून ‘ध्‍वनी आणि प्रकाश’ कार्यक्रमाचा आनंद घेतील.

   

   

*

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *