अरबी समुद्रातून भारताच्या पश्चिम किनार्याकडे वादळाचे मार्गक्रमण
द्वारका, दि. १४: चक्रीवादळ बिपरजॉय अरबी समुद्रातून भारताच्या पश्चिम किनार्याकडे सरकत आहे. ते गुरुवारी (१५ जून) गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे, त्यासाठी यंत्रणा सतर्क आहेत. दरम्यान, वादळाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, बिपरजॉय वादळाचा वेग गेल्या सहा तासांत मंदावला आहे.
आयएमडीच्या महासंचालकांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, बिपरजॉय वादळ सध्या ईशान्य अरबी समुद्रात गुजरातमधील जखू बंदरापासून २८० किमी अंतरावर आहे. गेल्या २४ तासांत वादळाचा वेग मंदावला असून तो जवळपास स्थिर आहे. त्यात फारशी हालचाल नाही.
महापात्रा यांनी सांगितले की, सध्याच्या अंदाजानुसार ते १५ तारखेच्या संध्याकाळी सौराष्ट्र आणि कच्छच्या किनारपट्टीवर जोरदार वादळाच्या रूपात धडकेल. या दरम्यान, वाऱ्याचा वेग ताशी १२५-१३५ किमी असेल, जो १५० किमी देखील असू शकतो. कच्छमध्ये वादळाचा वेग सर्वाधिक असू शकतो. मच्छिमारांना १५ तारखेपर्यंत ईशान्य अरबी समुद्रापासून दूर राहण्यास सांगण्यात आले आहे. आज बुधवारी सौराष्ट्र आणि कच्छमध्ये मुसळधार पाऊस पडेल. गुरुवारीही कच्छ, देवभूमी द्वारका, जामनगरमध्ये मुसळधार पाऊस पडेल.
वादळाचा प्रभाव गुरुवारी सर्वाधिक राहील. दुसऱ्या दिवशी १६ रोजी सकाळी त्याचा वेग ८५ किमीवर घसरेल. हे वादळ १७ तारखेला राजस्थानमध्ये दाखल होईल पण तोपर्यंत त्याचा वेग खूपच कमी असेल असे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.