भुजबळ म्हणाले “गरीबांचे पोट भरणाऱ्या शिवभोजनवर टीका करणाऱ्यांनी जरा वस्तुस्थिती पहावी”
मुंबई, दि. १२: राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं आणि त्यानंतर लगेच शिवभोजन थाळी योजनेच्या रूपाने शिवसेनेने निवडणूकीत दिलेलं एक आश्वासन तात्काळ अंमलात आणलं. मागील वर्षी लॉकडाऊन च्या काळात या थाळीने गरजवंतांना आधार दिला होता.
तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर गरजूंना शिवभोजन थाळी मोफत देण्याची घोषणा केली. यानंतर विरोधकांकडून विशेषतः भाजपकडून या निर्णयाची खिल्ली उडवण्यात आली होती. यावर महाविकास आघाडीकडून आज अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एक फेसबुक पोस्ट लिहीत विरोधकांना याबाबत राजकारण न करण्याचा इशारा दिला आहे.
पहा नेमकं काय म्हणाले आहेत छगन भुजबळ
गरीबांचे पोट भरणाऱ्या शिवभोजनवर टीका करणाऱ्यांनी जरा वस्तुस्थिती पहावी
दिवसेंदिवस वाढत असलेल्या करोना प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. अश्या काळात मजुर, कष्टकरी, निराधार, बेघर, गरीब असणाऱ्या अनेकांसाठी राज्य सरकारची शिवभोजन थाळी योजना आधार देणारी ठरत आहे. काल पहिल्याच दिवशी तब्बल ९६ हजार ३५२ शिवभोजन थाळ्यांचे वितरण करण्यात आले तर आज दुपारपर्यंत ९८ हजार ९८५ थाळ्यांचे मोफत वितरण करण्यात आले आहे.
कोरोना प्रादुर्भावानंतर लॉकडाऊनच्या काळात मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या पॅकेजनुसार अन्न नागरी पुरवठा विभागाने काल मोफत शिवभोजन थाळीचे वितरण करण्याचे आदेश निर्गमित केले त्यानंतर सर्वच केंद्रांनी कोरोनाचे सर्व नियम व राज्य सरकारने आखुन दिलेल्या नियमानुसार शिवभोजन थाळीचे मोफत वितरण करण्याचे आदेश देखील दिले आहे..
शिवभोजन थाळी ही राज्य सरकारची महत्वकांक्षी अशी योजना आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली गतवर्षी देखील या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली होती. यावर्षी पुन्हा हे संकट ओढावल्यामुळे विभागाला अधिक जलद गतीने काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
संचारबंदीच्या काळात हाताला काम नसलेला एक मोठा वर्ग आहे अशा गरजू कुटुंबासाठी शिवभोजन थाळी उपयोगी पडत आहे. ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही, रोजच्या जेवणाची भ्रांत आहे. ज्यांच्या घरात चूल पेटत नाही, अशा निराश्रित, निराधार, मजुर, बेघर अवस्थेत असणाऱ्या नागरिकांच्या रोजच्या जेवणाची सोय या माध्यमातून उपलब्ध झाली असल्याने समाधान आहे.
गेले अनेक दिवस समाज माध्यमांवर शिवभोजन थाळीवर टीका केली जात आहे मात्र गरीबांचे पोट भरणाऱ्या शिवभोजनवर टीका करणाऱ्यांनी जरा वस्तुस्थिती पहावी आणि मग समाज माध्यमात व्यक्त व्हावे.