वाचा Expert प्रेक्षक अनुभव: आशुतोष गोवारीकर “पानिपत” जिंकले म्हणायला हरकत नाही !
एका महिन्यापूर्वी जेव्हा ‘पानिपत’ ह्या सिनेमाचा ट्रेलर प्रसारित झाला तेव्हा संपूर्ण जगभरातून ह्या सिनेमाची विशेष दखल घेण्यात आली. बरेच प्रतिसाद सकारार्थी होते तर काही लोकांनी चक्क त्याला नावंही ठेवली. पण आज कदाचित तेच लोक ह्या चित्रपटाची तारीफ सुद्धा करत असतील. कारण चित्रपटाच्या निर्मितीचे सर्वच हेतू जवळ जवळ साध्य झाले आहेत असे दिसते. आशुतोष गोवारीकर म्हंटलं की काहीतरी बलाढ्य आणि भव्य दिव्य बघायला मिळणार असे मानणारे बरेच रसिक प्रेक्षक जगभरात आहेत. मागील चित्रपटामुळे कदाचित ते नाराजही झाले असतील पण इथे तसे नाही होणार असे दिसतेय. चित्रपटाचे कथानक मुळातच अंगावर काटा आणणाऱ्या एका थरारी युद्धाची गोष्ट आहे ज्याचे नाव “पानिपत” आपल्यातल्या प्रत्येकानेच लहानपणापासून ऐकले असावे. चित्रपटाचा इतिहास हजारो पानांच्या कादंबरीत सुद्धा मावणार नाही असा आहे त्यामुळे ‘चित्रपट का लांबला’ हे गोवारीकरांना विचारणे चुकीचे ठरेल. वेळ मर्यादा लक्ष्यात घेत त्यांनी महत्वाच्या सर्व टप्प्यांना हात लावला आहे. आणि कुठेही इतिहासाशी छेडछाड होणार नाही याची काळजी घेतली आहे. तसेच कोणताच प्रश्न अनुत्तरीत राहत नाही.
पहिल्याच सीनला शांततेत ‘हर हर महादेव’ म्हणत उदगीरच्या किल्ल्यावर संथपणे चढाई होते. आणि कोणताही गोंधळ न करता चित्रपटाच्या नायकाची एन्ट्री होते. इथेच दिग्दर्शकाचे प्राविण्य दिसून येते. चित्रपटात ‘अर्जुन कपूर’ सदाशिवरावांच्या भूमिकेत प्रामाणिकपणे प्रयत्न करताना दिसतो. सदाशिवराव जितके आक्रमक आणि चतुर योद्धे होते तितकेच ते शांत स्वभावाचे होते. त्यामुळे रणवीर सिंगने याआधी साकारलेल्या बाजीराव किंवा खिलजी या ऐतिहासिक पात्रांच्या ऊर्जेशी उगीच बरोबरी न करण्याचा निर्णय गोवारीकर आणि अर्जुन यांनी घेतला इथे दोघांचे कौतुक. आणि त्याच विषयाला धरून अर्जुनची तुलना रणवीर सिंग सोबत झाली. त्यात अर्जुनने न घाबरता सर्व अलोचाकांचे बाण झेलले, इथे त्याचा चित्रपटाशी असलेला प्रामाणिकपणा दिसतो.
‘क्रिती’ ने अतिशय सहजरित्या मराठमोळी मुलगी आणि एक योद्धी साकारली आहे. स्त्री किती शक्तिशाली असते हे तिच्या कोणत्याही सीन मध्ये तिने निभावलेल्या पात्रात दिसून येते. संजय दत्त सुद्धा उगीच अफगाणी टोन वगैरे मध्ये बोलण्याच्या फंद्यात न पडता त्याचा राक्षसासारखा विलन साकारून गेला आहे. तसेच चित्रपटात इतर कोणीही हिंदी हे हिंदी टोन मधेच बोलताना दिसतात. मराठी टोन पकडला म्हणजे मनोरंजन होईल अश्या भासात कोणी अडकलेला दिसत नाही. तसेच मोहनीश बहल आणि पद्मिनी कोल्हापुरे थोडा वेळ का असे ना आपला तीस चाळीस वर्षांचा अनुभव दाखवून जातात. तसेच अभिनेता ‘कश्यप परुळेकर’ रघुनाथ रावांच्या भूमिकेत गरजताना दिसतो. अब्दालीला पहिलेच अटकेपार पळवणारा तो राघोबाच हे चित्रपटात नसले तरी त्याच्या अभिनयातून तो सर्वांना मनवून सोडतो. शूजा उद्दौला म्हणून कुणाल कपूर, ज्याचा आवाज अख्ख चित्रपटगृह हादरवून सोडतो प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात राहतो. त्याच सोबत झीनत अमान ना बऱ्याच वर्षांनी पडद्यावर पाहून मन प्रसन्न होते. विशेष म्हणजे त्यांना साधारण पेहराव दिला असता तरी त्या सकीना बेगमच वाटल्या असत्या.
नितीन देसाई (प्रोडक्शन डिझाईन), नीता लुल्ला (कॉस्ट्यूम डिझाईन), विक्रम गायकवाड (हेअर आणि मेकअप), रोहन मापुस्कर (कास्टिंग) आणि अजय-अतुल (संगीत) यांच्या सहभागासाठी स्वतंत्र लेख लिहावा लागेल. चित्रपटाचे दिग्दर्शन बघता आशुतोष गोवारीकर यांचं हे अपग्रेडेड वर्जन आहे असे म्हणावे लागेल. ह्या चित्रपटातलं युद्ध हे आज पर्यंत सर्वात जबरदस्त होतं असं नाही म्हणता येणार. पण ते तितकंच चटका लावून जाणारं होतं. युद्धाची तयारी सुद्धा एका युद्धाप्रमाणेच दाखवण्यात गोवारीकरांना यश आले आहे. हा इतिहास आपण ऐकला आहे, वाचला आहे, पण तो स्वयं अनुभवायचा असेल तर हा चित्रपट बघणे जास्त योग्य ठरेल.
- शार्दूल जोशी