“जागतिक वाहन उत्पादनात प्रथम क्रमांकाचे स्थान मिळवण्याचे भारताचे लक्ष्य” – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
नवी दिल्ली, दि. १५: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नवी दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय मूल्य शिखर परिषद २०२५ मध्ये वाहन उत्पादन, हरित गतिशीलता आणि पायाभूत सुविधांच्या नवोन्मेषामध्ये भारताला जगातील आघाडीचे केंद्र म्हणून स्थान देण्यासाठीच्या महत्त्वाकांक्षी पथदर्थकाचे अनावरण केले.
भारत आता जपानला मागे टाकून जागतिक स्तरावरील तिसऱ्या क्रमांकाची वाहन उद्योग बाजारपेठ बनला आहे आणि पुढील पाच वर्षांत प्रथम क्रमांकाचे स्थान मिळवण्याचे उद्दिष्ट सरकारसमोर आहे. ” वाहन उद्योग क्षेत्रातील सर्व प्रमुख जागतिक ब्रँड आता भारतात उपस्थित आहेत. आता त्यांचे लक्ष सुटे भाग जोडण्यापासून पुढे जाऊन भारतातून जगात वाहने निर्यात करण्याकडे वळले आहे,” असे गडकरी म्हणाले. त्यांनी पुढे असे सांगितले की भारताचे दुचाकी क्षेत्र त्याच्या उत्पादनापैकी ५० % पेक्षा जास्त निर्यात करते, जे देशाच्या वाढत्या जागतिक ठशाचे प्रतीक आहे.
स्वच्छ गतिशीलतेबद्दल बोलताना मंत्र्यांनी इलेक्ट्रिक वाहने, हायड्रोजन इंधन आणि पर्यायी इंधनांमधील भारताचे नेतृत्व अधोरेखित केले. “आम्ही आधीच हायड्रोजन ट्रक सुरू केले आहेत आणि दहा मार्गांवर पथदर्शी प्रकल्प सुरू आहेत.आमचे उद्दिष्ट हरित गतिशीलतेमध्ये जगाचे नेतृत्व करण्याचे आहे,” असे त्यांनी सांगितले.टाटा मोटर्स, अशोक लेलँड, रिलायन्स आणि इंडियन ऑइल सारख्या कंपन्यांच्या सहाय्याने हायड्रोजन पायाभूत सुविधांना वेग देण्यासाठी सरकारने ₹६०० कोटी अनुदान दिले आहे. आयसोब्युटेनॉल आणि बायो-बिटुमेन सारख्या नवीन इंधन पर्यायांमध्ये प्रगती झाल्याचेही त्यांनी नमूद केले, ज्यांची सध्या सक्रिय चाचणी सुरू आहे.
भारतातील रस्ते पायाभूत सुविधांमध्येही परिवर्तनीय प्रगती झाली आहे. “भारताकडे आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रस्ते जाळे आहे. आम्ही प्रवासाचा वेळ खूपच कमी केला आहे – पानिपत ते दिल्ली विमानतळ या अंतरासाठी आता तीन तासांऐवजी फक्त ३५ मिनिटे लागतात,” असे त्यांनी नमूद केले. चेन्नई-बेंगळुरू एक्सप्रेसवे आणि २३,००० कोटी रुपयांचा बेंगळुरू रिंग रोड यासारखे महत्त्वाचे प्रकल्प जोडणीची पुनर्परिभाषा करण्यासाठी तसेच शहरी गर्दी कमी करण्यासाठी सज्ज आहेत.
शाश्वतता हा भाषणाचा मध्यवर्ती विषय होता. “आपण कचऱ्याचे संपत्तीत रूपांतर करत आहोत. गाझीपूरच्या क्षेपणभूमीतून निघणारा ८० लाख टनांहून अधिक कचरा रस्ते बांधणीत वापरण्यात आला आहे.आम्ही यामुळे कचऱ्याच्या डोंगराची उंची आधीच सात मीटरने कमी झाली आहे,” असे मंत्री म्हणाले. त्यांनी धानाच्या पेंढ्यापासून बनवलेल्या बायो-बिटुमेनच्या यशस्वी चाचण्यांकडे लक्ष वेधले, याने पेट्रोलियमवर आधारित बिटुमेनपेक्षा चांगली कामगिरी करून दाखविली आहे तसेच पेंढा जाळण्याचे प्रमाण कमी करण्यासही मदत केली आहे.
गडकरी यांनी प्रीकास्ट रस्ते बांधकाम, बोगदा अभियांत्रिकी, हायड्रोजन वाहतूक प्रणाली आणि वर्तुळाकार अर्थव्यवस्था या उपायांसह प्रमुख नवोन्मेष क्षेत्रांमध्ये जागतिक भागीदारी करण्याचे आवाहन केले. “आमच्याकडे संसाधनांची कमतरता नाही. आम्ही रस्त्यांचे चलनीकरण केले आहे आणि आमचे उत्पन्न मजबूत आहे. आम्हाला तुमच्या नवोन्मेषाची, तुमच्या तंत्रज्ञानाची आणि तुमच्या सहकार्याची गरज आहे,” असे आवाहन त्यांनी आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींना केले.



