कबुतरखान्यांच्या वादावरून राज ठाकरे यांनी मंत्री मंगलप्रभात लोढांना सुनावले खडे बोल
मुंबई, दि. १४: मागील काही दिवसांपासून मुंबई महापालिका हद्दीतील कबुतरखान्यांचा विषय इरेला पेटला असून मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरखाने बंद करण्याचे आदेश काढूनही याविरोधात दादर पश्चिमेकडील कबुतरखान्याजवळ जैन समाजातर्फे आंदोलन करण्यात आले होते. या साऱ्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपलं मत मांडलं. आज १४ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर, राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी जैन मुनी, मंत्री लोढा व राज्य सरकारचा समाचार घेताना ते म्हणाले कि, “सध्या मुंबईतील दादर येथील कबुतरखान्यावरून जो वाद सुरु आहे, त्याबाबत माननीय उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे, त्यानुसार सर्वानी वागलं पाहिजे. आणि न्यायालयाने जर बंदी घातली आहे तर जैन मुनींनी पण त्याचा विचार केला पाहिजे. कबुतरांमुळे काय रोग होऊ शकतात हे अनेक डॉक्टरांनी सांगितलं आहे तरीही कबुतरांना खायला घातलं जाणार असेल तर पोलिसांनी खायला घालणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. जेंव्हा मुळातच न्यायालयाचा आदेश असताना आंदोलन झालं तेंव्हाच सरकारने कारवाई करायला पाहिजे होती. त्यात राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा सहभागी झाले. कोर्टाचा आदेश काय आहे हे लोढांना माहित नाही का ? लोढांनी हे विसरू नये की ते राज्याचे मंत्री आहेत कुठल्या धर्माचे नाहीत.”
पुढे ते म्हणाले कि, “काल मराठी लोकांनी आंदोलन केली तेंव्हा त्यांची धरपकड झाली, पत्रकारांना मारहाण झाली. सरकारचं नक्की काय सुरु आहे हेच कळत नाहीये. निवडणुका तोंडावर आल्या आहेत म्हणून समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आधी हिंदी सक्ती करून पाहिली आता कबुतरांचा विषय.”
कल्याण-डोंबिवली येथील कत्तलखाने बंद ठेवण्याच्या पालिकेच्या निर्णयावर देखील त्यांनी कडाडून टीका केली. या बाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले, “१५ ऑगस्टला कल्याण-डोंबिवली महापालिकेने कत्तलखाने बंद ठेवण्याचा आणि मांसविक्री बंद करण्याचा आदेश दिलाय. मुळात कोणी काय खावं हे ठरवण्याचा अधिकार महापालिकेला कोणी दिला ? मी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगितलं आहे की ही बंदी पाळू नका. स्वातंत्र्यदिन म्हणून १५ ऑगस्ट साजरा करायचा आणि त्या दिवशी खायचं स्वातंत्र्य नाही हा काय प्रकार आहे ?”
